UPSC Success Story : कहाणी त्या महिला अधिकाऱ्याची जिच्यासाठी आईने सोडली नोकरी; जागृती बनली IAS

करिअरनामा ऑनलाईन । म्हणतात ना; आई आणि मुलीचे (UPSC Success Story) नाते मैत्रिणीसारखे असते; ते अगदी खरं आहे. या नात्यातील कथा खूप काही नैतिक मूल्ये शिकवून जातात. मुलांच्या यशात पालकांचा नेहमी मोठा वाटा असतो. आज आपण अशाच एका मायलेकीची कथा पाहणार आहोत. ही गोष्ट तुम्हाला त्याग आणि समर्पण शिकवेल.
लेकीसाठी सोडली नोकरी
जागृती अवस्थी आणि तिची आई मधुमालती अवस्थी  या मायलेकीचं नातं अनोखं आहे. मुलीच्या यशासाठी आईने नोकरीचा त्याग केला. IAS अधिकारी जागृती अवस्थीची प्रेरणा देणारी कहाणी आणि तिचा यशाचा मंत्र जाणून घेऊया…

इंजिनिअरिंग नंतर मिळाली सरकारी नोकरी
IAS जागृती अवस्थी ही मध्य प्रदेशातील फतेहपूर येथील मुळ रहिवासी आहे. 2020 मध्ये झालेल्या UPSC परिक्षेत तिने संपूर्ण देशात दूसरा  क्रमांक मिळवून इतिहास रचला आहे. ती IAS अधिकारी बनली आहे. जागृतीने भोपाळच्या मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. यानंतर तिला भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेडमध्ये नोकरी देखील मिळाली.

आई-वडील दोघेही शिक्षक
जागृतीला पहिल्यापासून IAS व्हायचे होते. त्यामुळे काही काळानंतर तिने BHELची नोकरी सोडली आणि यूपीएससीची तयारी सुरू केली. जागृतीचे वडील डॉ. एस.सी.अवस्थी हे प्राध्यापक आहेत. आई मधुमालती अवस्थी याही शिक्षिका होत्या. पण आईने आपल्या मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरी सोडली आणि मुलीचे करिअर घडवण्यासाठी पाठबळ दिले. अभ्यासामध्ये व्यत्यय येवू नये यासाठी त्या घरी टीव्हीसुध्दा सुरु करत नव्हत्या.

दुसऱ्या प्रयत्नात संपूर्ण देशात मारली बाजी
जागृती अवस्थीने 2019 मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली होती. या परिक्षेत ती पूर्व परीक्षा पास करु शकली नाही. या अपयशाने ती खूप अस्वस्थ झाली होती. तिने विचार केला की दुसरी संधी का घेऊ नये? यानंतर जागृतीने 2020 मध्ये पुन्हा UPSCची परीक्षा दिली. निकाल आल्यावर तिचा विश्वास बसेना. तिने UPSC मध्ये देशात चक्क दूसरा क्रमांक पटकावला होता.

शॉर्टकटने यश मिळत नाही
जागृती अवस्थीला उत्तर प्रदेश केडर मिळाले आहे. जीवनात शॉर्टकटने यश मिळत नाही, असे जागृतीचे मत आहे. कोणत्याही परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी (UPSC Success Story) सातत्यपूर्ण तयारी खूप महत्त्वाची असते. यूपीएससीच्या तयारीबाबत, ती आधी संपूर्ण अभ्यासक्रम नीट वाचण्याचा सल्ला देते. यानंतर, त्यानुसार पुस्तके निवडण्याचेही सांगते.
जागृतीने UPSC देणाऱ्या उमेदवारांना दिवसातून 8 ते 10 तास अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रत्येक दिवसाचे वेळापत्रक तयार करण्याचा सल्ला ती देते. तसेच जो विषय कमकुवत आहे त्यावर अधिक लक्ष केंद्रितकरण्यासाठी ती सांगते. जागृती सांगते की, सुरुवातीला ती आठ ते दहा तास अभ्यास करायची. नंतर तीने हा वेळ वाढवला आणि ती 10 ते 12 तास अभ्यास करु लागली. परीक्षेच्या दोन महिन्यांपूर्वी अभ्यासाची वेळ 12 ते 14 तासांपर्यंत वाढली होती. तिला परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात अपयश आले पण ती खचली नाही. तिने स्वतःमधील कमतरता ओळखल्या आणि त्या सुधारण्यावर भर दिला.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com