Agriculture Admission : इंजिनियरिंग प्रमाणेच होणार कृषी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील कृषी महाविद्यालयांच्या (Agriculture Admission) केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आला आहे.  कृषी महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकीप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यानंतर कृषी महाविद्यालयात रिक्त जागांची माहिती मिळणार आहे. त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्याला पर्याय निवडता येणार आहे. यामुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होणार असून, महाविद्यालयांनाही अंतिम तारखेपर्यंत प्रवेश देता येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

मात्र, हा बदल नेमका कोणत्या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. राज्यात सध्या CET सेलमार्फत कृषी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून, सोमवार दि. 31 जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली (Agriculture Admission) जाणार आहे. नोंदणी करतानाच विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयानुसार पसंतीक्रम भरुन घेण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक फेरीसाठी निवड यादी प्रसिद्ध केली जाते. तर अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना रिक्त जागांनुसार प्रत्येक फेरीसाठी नव्याने पसंतीक्रम भरता येतात.

आता ही पध्दत कृषी अभ्यासक्रमांसाठीही राबविली जाणार आहे. कृषी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी असलेल्या महाविद्यालये किंवा संस्थांना खासगी कृषी विद्यापीठ स्थापण्यास परवानगी देण्यासंदर्भातही बैठकीत विचारविनिमय  करण्यात आला. राज्यातील विविध कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये, रोपवाटिका आदींच्या प्रश्नांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले आहे.
निर्णयाचे फायदे – (Agriculture Admission)
1. विद्यार्थी केंद्रित प्रवेश प्रक्रिया
2. राखीव जागांचा लाभही विद्यार्थ्यांना मिळणार
3. कृषी प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत केंद्रीभूत पद्धतीनं राबविण्यात येणार
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com