करिअरनामा । प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांची स्कॅम १९९२ ही वेबसिरीज सध्या खूप चर्चेत आहे. ही सत्यघटनेवर आधारित वेबसिरीज स्टॉक मार्केटचा अमिताभ बच्चन समजल्या जाणाऱ्या हर्षद मेहता याच्यावर आधारित आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा त्याचे नाव प्रकाशझोतात आले आहे. आपल्याकडच्या आलिशान कार मुळे, भरमसाठ संपत्तीमुळे आणि पंतप्रधानांवर लाच घेतल्याचा आरोप केल्यामुळे नेहमीच विशेष चर्चेत असणाऱ्या हर्षद मेहताला स्टॉक मार्केटचा बादशहा म्हंटले जायचे. हर्षद शांतीलाल मेहता खऱ्या अर्थाने सर्वांच्या निदर्शनास आले ते १९९२ च्या स्कॅम घोटाळ्यानंतर होय. हा घोटाळा इतका मोठा होता की यानंतर शेअर मार्केटचे नियमन करण्यासाठी सेवी नावाची एक नियामक संस्था निर्माण करण्यात आली होती.

२९ जुलै १९५४ साली गुजरातच्या राजकोट मध्ये जन्मलेल्या हर्षद मेहता यांनी काही काळ छत्तीसगडच्या रायपूर मध्ये देखील व्यतीत केला. पण त्यानंतर ते आले त्यावेळी बॉम्बे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आताच्या मुंबई शहरात होय. बी.कॉम झाल्यानंतर त्याने एका विमा कंपनीत सेल्स मध्ये काम केले. पण फार काळ ते तिथे राहिले नाहीत त्यांनी नंतर एका ब्रोकरेज फर्म मध्ये नोकरी केली. या फर्मचे सर्वेसर्वा प्रसन्न परीजीवन दास यांना गुरु मानले आणि स्टॉक मार्केटचे छोटे छोटे हातखंडे शिकायला त्यांनी सुरुवात केली. १९८४ मध्ये स्वतःची कंपनी सुरु करत त्यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे सभासदत्व घेतले. त्यानंतर मात्र हर्षद यांचे नाव सर्वत्र प्रसिद्ध झाले. जवळपास अनेक मासिकांमध्ये त्यांचे लेख येत होते. मोठमोठ्या लोकांना त्यांच्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती.
हर्षद मेहता या नावाचे स्टॉक मार्केट कुतुहूल मोठ्या प्रमाणात वाढले त्याचे कारण म्हणजे ज्या कोणत्या शेअर मध्ये ते हात घालायचे त्या शेअरची किंमत मोठ्या प्रमाणात वाढायची. त्यामुळे त्यांना स्टॉक मार्केटमधला कोहिनुर देखील म्हंटले जायचे. तर काहीजण त्यांना पारसमणी म्हणायचे जो ज्या शेअर ला हात लावतो त्याचे सोने होऊन जाते. एसीसी चे शेअर हर्षद मेहता यांनी घेतले होते, तेव्हा त्याची किंमत २०० रु होती पण यानंतर त्याची किंमत ९ हजार च्या वर गेली. हर्षद असे काय करतो की अचानक शेअर एवढे वाढतात हे सर्वांनाच जाणून घ्यायचे होते. त्यावेळी टाइम्स ऑफ इंडियाच्या पत्रकार सुचेता दलाल यांनी या सगळ्या प्रकरणावरचा पडदा उघडत हर्षद मेहता यांचे सत्य जगासमोर आणले होते. आणि हे सत्य समोर आल्यावर भल्याभल्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. सुचेता यांनी देबाशिष बासू यांच्यासोबत मिळून द स्कॅम नावाचे एक पुस्तकही लिहिले होते.

सुचेता बऱ्याच कालावधीपासून हर्षद यांच्या कामाचे सत्य शोधण्यात व्यस्त होत्या. पण १९९२ साली त्यांना यामध्ये यश आले. हर्षद बँकेकडून १५ दिवसांसाठी कर्ज घेतात आणि १५ दिवसांनी ते परत करतात असे त्यांना समजले. पण कोणतीच बँक १५ दिवसांसाठी कर्ज देत नाही. पण हर्षद यांनी सुरुवातीच्या काळात घेतलेल्या प्रशिक्षणाचा इथे फायदा होत होता. बँकांना जेव्हा रोख रकमेची गरज असते तेव्हा त्या सरकारी करार दुसऱ्या बँकांकडे गहाण ठेवून पैसे काढत असतात. पण कराराची देवाणघेवाण न होता एका पावतीवर हे काम होत असते. आणि या कामासाठी मध्यस्थी असतात. आपल्या बँकिंग क्षेत्रातील ओळखीच्या मदतीने मेहता यांनी नेमकी हीच नस ओळखत हा पैसा शेअर बाजारात लावत कोट्यावधी रुपयांचा नफा कमावला.
१९९२ साली देशाची अर्थव्यवस्था एका वेगळ्या वळणावर पोहोचली होती. खाजगीकरण आणि परदेशी गुंतवणूक यामध्ये वाढ होत होती. शेअर मार्केट मध्ये देखील वाढ होत होती. पर्यायाने हर्षद मेहता यांच्या प्रगतीतही वाढ होत होती. पण अचानक शेअर मार्केट कोसळले आणि हर्षद मेहता यांचे सत्य समोर आले. शेअर मार्केट कोसळल्यामुळे मेहता बँकांचे पैसे परत करू शकले नाहीत. ही घटना समोर येऊन याची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी झाल्यावर यावरच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती तयार करण्यात आली. सीबीआयने हर्षद सोबत त्यांचे दोन्ही भाऊ अश्विन आणि सुधीर यांनाही अटक केली. ७२ गुन्हे प्रकरणे आणि ६०० हुन अधिक दिवाणी प्रकरणे हर्षद यांच्या विरोधात दाखल करण्यात आले होते. याच वेळेला हर्षद यांनी एक पत्रकार परिषद बोलावून त्याने पंतप्रधान नरसिंह राव यांना एक कोटी रुपयांची लाच दिली असल्याचा खुलासा केला होता.
हर्षद यांना या प्रकरणात जामीन मिळाल्यावर त्यांनी पुन्हा त्यांचा व्यवसाय सुरु केला. हळूहळू अनेक प्रकरणांमधून त्यांची सुटका होत होती. पण २००१ साली त्यांना पुन्हा अटक झाली. ३१ डिसेंबर २००१ ला त्यांचा ह्रदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. आर बी आय यांच्या एका अहवालानुसार १९९२ चा हा घोटाळा ४ हजार २५ कोटी रुपयांचा होता. हर्षद मेहता यांना नेहमीच आपणच या मार्केटचे राजा आहोत असे वाटत आले मात्र वेळेने त्यांचा हा भ्रम दूर केला. पैशाच्या अति लालसेपायी मेहता यांनी सर्व सीमा पार केल्या. ते कोर्टात सुनावणीसाठी जायचे तेव्हा लोक त्यांच्या पक्षात घोषणा देत गर्दी करत असत. या सर्व प्रकरणाचा आपल्या लेखणीने पर्दाफाश करणाऱ्या सुचेता यांना २००६ साली पदमश्री देण्यात आला होता.
