Breaking News : राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग 27 जानेवारीपासून सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांची माहिती

मुंबई | राज्यात कोरोनामुळे लाॅकडाऊन जाहीत झाल्यापासून सर्व शाळा बंद होत्या. यानंतर काही दिवसांपूर्वी नववी, दहावी, बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले होते. आता येत्या 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्गही सुरु करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

राज्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत २७ जानेवारीपासून सुरू होतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिक्षण विभागाची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यास अनुमती दिल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

दरम्यान, शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. दरम्यान, शाळा सुरू करण्यासंदर्भातील अधिकार हे स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाच्या संसर्गास सुरुवात झाल्यापासून राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर लॉकडाऊनच्या नियमांमुळे शाळा बंद होत्या. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले होते. त्यानंतर काही काळापूर्वी नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.