१ सप्टेंबरपासून शाळा आणि शैक्षणिक संस्था पुन्हा सुरु करण्याचा केंद्राची योजना

नवी दिल्ली । कोरोना महामारीमुळं खबरदारी म्हणून बंद असलेल्या शाळा आणि शैक्षणिक संस्था पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने योजना आखली आहे. १ सप्टेंबर ते १४ सप्टेंबरदरम्यान टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा केंद्राचा विचार आहे. ३१ ऑगस्ट रोजी लॉकडाउन संपल्यानंतर केंद्र सरकारकडून निर्बंध शिथील करत नव्या गाइडलाइन्स प्रसिद्द केल्या जातील. त्यावेळी ही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक टाइम्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर केंद्र सरकारकडून लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आणि शाळा बंद झाल्या. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडलेल्या बैठकीत शाळा सुरु करण्याच्या योजनेवर चर्चा झाली. ३१ ऑगस्ट रोजी जाहीर होणाऱ्या अनलॉकच्या नव्या गाइडलाइन्समध्ये याचा समावेश असण्याची शक्यता आहे. यावेळी राज्यांना शाळा सुरु करण्यासंबंधी सांगितलं जाऊ शकतं. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत कसं आणि कधी आणायचं हा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारांकडे असणार आहे.

शाळा आणि शैक्षणिक संस्थांसाठी विस्तृत मानक कार्यप्रणाली प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये जुलै महिन्यात शाळा शिक्षण विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणाचाही सहभाग असेल. या सर्व्हेमध्ये पालक मुलांना शाळा पाठवण्यास तयार नसल्याचं सांगण्यात आलं होतं. यावर राज्य सरकारांनी केंद्राकडे आर्थिक स्थिती बिकट असलेल्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, लॉकदौंमुळं २३ मार्चपासून संपूर्ण देशभरातील शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद आहेत. तेव्हापासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे.