UPSC Success Story : कोरडी भाकरी खाऊन दिवस काढणाऱ्या कुटुंबातील मुलगा जिद्दीने झाला IAS

करिअरनामा ऑनलाईन । आई-वडील आपल्या मुलांचे भवितव्य (UPSC Success Story) घडवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कष्ट उपसायला तयार असतात. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील एका सामान्य रिक्षाचालकाने आयुष्यातील प्रत्येक अडचणीवर मात करुन आपल्या मुलाला शिकवलं. प्रसंगी ते स्वतः उपाशी झोपले पण आपल्या मुलाला कोणतीही कमतरता त्यांनी भासू दिली नाही. मुलानेही IAS अधिकारी होवून वडिलांच्या कष्टाचे पांग फेडले. आपण बोलत आहोत IAS गोविंद जैस्वाल यांच्याविषयी… जाणून घेवूया त्यांचा लहानपणापासून अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता याविषयी….

वडील आणि बहिणीच्या त्यागामुळेच शक्य झालं
IAS गोविंद जयस्वाल हे उत्तर प्रदेशातील वाराणसीचे रहिवासी आहेत. सध्या ते आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागात संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी (UPSC Success Story) लहानपणापासून आयुष्यात खूप संघर्ष पाहिला आहे. या खडतर प्रवासात त्याच्या वडिलांनी आणि बहिणीने त्यांना खूप साथ दिली. वडील आणि बहिणीने केलेला त्याग आणि आशीर्वादाशिवाय ते आयुष्यात कधीच या टप्प्यावर पोहोचले नसते; असं गोविंद मानतात.

10×12 च्या खोलीत कुटुंब राहत होतं
गोविंद जैस्वाल यांचे वडील एका रिक्षा कंपनीचे मालक होते आणि त्यांच्याकडे 35 रिक्षा होत्या. गोविंदची आई ब्रेन हॅमरेजची शिकार झाली होती. त्यावेळी पत्नीच्या उपचाराचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी बहुतेक रिक्षा विकल्या. यामुळे त्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आणि त्यांना गरीबिचा सामना करावा लागला. गोविंद इयत्ता सातवीत शिकत असताना त्यांची आई वारली. यानंतर त्यांचे वडील, गोविंद आणि त्यांच्या मुलींसह, काशीच्या अलायपुरा येथे 10×12 च्या खोलीत राहत होते.

कोरडी भाकरी खाऊन पोटाची खळगी भरली (UPSC Success Story)
अनेकवेळा गोविंद आणि त्यांचे कुटुंब केवळ कोरडी भाकरी खाऊन पोटाची भूक भागवत असत. असे असतानाही गोविंदच्या वडिलांनी आपल्या चार मुलांच्या शिक्षणात कोणतीही कसर सोडली नाही. त्यांच्या तीनही मुलींनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. गोविंद यांच्या वडिलांनी मुलींच्या लग्नासाठी उरलेल्या रिक्षाही विकल्या.

पायाला जखम असूनही वडील रिक्षा चालवायचे
गोविंद जयस्वाल यांचे प्राथमिक शिक्षण उस्मानपुरा येथील सरकारी शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी वाराणसी येथील हरिश्चंद्र विद्यापीठातून मॅथ्समध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले. 2006 मध्ये गोविंद यूपीएससी (UPSC) परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीला गेले होते. गोविंद यांना पैसे पाठवण्यासाठी त्यांच्या वडिलांनी पायाला जखम असूनही रिक्षा चालवली आहे. त्यांनी मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागावा म्हणून अनेकदा जेवणही केले नाही; की पायाच्या जखमेवर उपचारही केले नाहीत.

एक वेळचा टिफिन आणि चहा बंद केला
गोविंद यांचं अधिकारी होण्याचं स्वप्न होतं. त्यांचा दिल्लीमध्ये UPSC चा कसून अभ्यास सुरु होता. बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी महागड्या कोचिंग क्लासला प्रवेश घेतला नाही. केवळ सेल्फ स्टडी करुन ते ही परीक्षा पास झाले. वडिलांना खर्चात हातभार लागावा म्हणून ते शाळेतील मुलांची (UPSC Success Story) शिकवणी घ्यायचे. पैसे वाचवण्यासाठी त्यांनी एक वेळचा टिफिन आणि चहा बंद केला होता. पण त्यांनी अभ्यासात कोणतीच कसर सोडली नाही. 2007 मध्ये त्यांनी UPSC परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात संपूर्ण भारतात 48 वा क्रमांक पटकावला आणि ते IAS अधिकारी झाले. गोविंद जैस्वाल IAS तर त्यांच्या पत्नी चंदना चौधरी या IPS अधिकारी आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com