Education : महत्वाची बातमी!! ‘या’ विद्यार्थ्यांच्या शाळेची वेळ बदलणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

करिअरनामा ऑनलाईन । शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (Education) एक महत्वाची अपडेट आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी 9 वाजल्यानंतरच सुरु करण्यात येईल; अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. मुलांची झोप पूर्ण व्हावी; यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी सूचना केली होती.
सध्या आयुष्य खूप धकाधकीचं होत चाललं आहे. सकाळी लवकर शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांची शाळा उशिराने सुरू करण्याबाबत सरकारने विचार करावा; असे राज्यपालांनी अलिकडेच सुचविले होते.

राज्यपालांच्या या मताशी सरकार सहमत आहे. मात्र एकट्याने (Education) याबाबत निर्णय घेणे योग्य नसल्याने तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. मनोवैज्ञानिक, बालरोग तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले.
पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमांच्या आणि सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांना हा नियम लागू होईल; असेही ते म्हणाले. सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ 7 ऐवजी 9पर्यंत पुढे ढकलल्यास मुलांची झोप पूर्ण होऊन त्यांना शिक्षणाची गोडी लागेल; आणि त्यांच्या आकलन क्षमतेवर चांगला परिणाम होईल; असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

आणखी काही महत्वाचे निर्णय (Education) –
बालवाडी, छोटा शिशू आणि मोठा शिशू हे वर्ग निर्माण करून ते मुख्य शाळेला जोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानंतर आता बालवाडी ते दुसरीला ‘पूर्व प्राथमिक विभाग’ संबोधण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com