शाळा कधी सुरु होणार? शिक्षण आयुक्त म्हणतात…

पुणे । देशातील कोरोनाची स्थिती पाहून केंद्राने देशव्यापी संचारबंदी जाहीर केली होती. याला आता दोन महिने उलटून गेले आहेत. संचारबंदीत सर्व उद्योग व्यासायांसोबत, शाळा, महाविद्यालये तसेच उत्तर शैक्षणिक संस्थाही बंद करण्यात आल्या होत्या. राज्यात १५ जून पासून शाळा सुरु होतील अशा चर्चा होत्या. मात्र महाराष्ट्राची सद्यस्थिती संक्रमणाच्या दृष्टीने धोकादायक आहे. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी असली तरी विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्वपूर्ण आहे. त्याबाबतीत कोणताच धोका पत्करता येणार नाही. त्यामुळे १५ जूनपासून शाळा सुरु होतील की नाही याबद्दल सध्यातरी प्रश्नचिन्हच असल्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितले आहे.

सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि आपत्ती निवारण यंत्रणा एकत्रित आपापल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून याबाबतीतील निर्णय घेतील अशी माहिती त्यांनी दिली. तत्पूर्वी शाळेला शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांशी सध्या बोलत आहेत. सर्व घटकांची मते जाणून घेतल्यानंतरच निर्णय घेतला जाणार आहे. जर एखाद्या जिल्ह्यात एकही रुग्ण नसेल तर त्या ठिकाणचे विद्यार्थी शाळेत येऊ-जाऊ शकतात. पण तो निर्णयही संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आपत्ती निवारण यंत्रणा यांनी एकत्रित आढावा बैठक घेऊन घेऊ शकतात. असे सोळंकी यांनी सांगितले.

परंतु शाळा कधी सुरु करायच्या हा निर्णय अचानक किंवा अगदी ८-१० दिवस आधीही जाहीर करता येणार नाही. चुकून एखादा रुग्ण आढळलाच तर निर्णय मागे घ्यावा लागेल. त्यामुळे संपूर्ण विचारांती निर्णय घेतला जाईल. अशी माहिती मिळाली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना भूगोलाच्या पेपरला लेखी परीक्षेच्या एकूण सरासरी गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा कुणालाही समाजशास्त्रात नापास करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. संचारबंदीमुळे भूगोलाची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यावर हा तोडगा काढण्यात आला आहे.

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com