Talathi Bharti : नव्या वर्षात ‘यादिवशी’ लागणार तलाठी भरतीचा निकाल; आठ लाख उमेदवारांची उत्सुकता शिगेला 

करिअरनामा ऑनलाईन । बहुचर्चित तलाठी भरती संदर्भात एक (Talathi Bharti) महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील सुमारे आठ लाख उमेदवार तलाठी भरती परीक्षेच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. टीसीएस कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान तलाठी परीक्षेवर अनेक विद्यार्थ्यांनी आक्षेपही घेतला होता.

तलाठी भरतीचा (Talathi Bharti) निकाल जानेवारीपर्यंत लागण्याची शक्यता अप्पर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षा राज्य समन्वयक सरिता नरके यांनी वर्तवली आहे. तलाठी भरती परीक्षेसाठी साडे अकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. अर्जाच्या छाननी नंतर ४४६६ जागांसाठी दहा लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली आहे.
परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांमध्ये घेण्यात आली होती. त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय व्हायला नको म्हणून कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करण्याचे काम सुरु आहे.

तलाठी भरती परीक्षेतील २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ उमेदवारांकडून आलेले आक्षेप, १४६ प्रश्नांमध्ये करण्यात येणारी दुरुस्ती अशा अनेक अडचणींमुळे निकालास विलंब होत असून आठ लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, टीसीएस (TCS) कंपनीकडून गुणवत्तापूर्ण निकाल जाहीर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होणार अशी शक्यता अपर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षा राज्य समन्वयक सरिता नरके यांनी वर्तवली आहे.

निकाल का लांबला? (Talathi Bharti)
संपूर्ण परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ आक्षेप उमेदवारांकडून नोंदवण्यात आले. या आक्षेपांपैकी एकूण वैध १४६ प्रश्नांसाठी घेतलेले ९०७२ आक्षेप परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीकडून योग्य ठरवण्यात आले आहेत. दरम्यान, परीक्षेत एकूण ५७०० प्रश्न होते. आक्षेप नोंदवण्याच्या कालावधीत आलेल्या आक्षेपांपैकी नऊ हजार आक्षेप टीसीएस कंपनीने ग्राह्य धरले. त्यानुसार १४६ प्रश्नांमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया लांबली असल्याची माहिती नरके यांनी दिली. मोठ्या संख्येने उमेदवार असणे आणि आक्षेपानंतर आलेल्या अडचणी बघता निकालाला विलंब हाेत असल्याची माहिती त्यांनी दिली. निकालासंदर्भातील बहुतांश काम पूर्ण होत आले आहे. गुणवत्ता यादी तयार करणे, जिल्हानिहाय निकाल जाहीर करणे असे काम सुरू आहे. त्यामुळे जानेवारीपर्यंत निकाल जाहीर होईल अशी अपेक्षा नरके यांनी व्यक्त केली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com