राज्यातील तरुण उद्यमींसाठी खुशखबर! स्टार्टअप्सना पेटंट मिळण्यासाठी राज्य सरकारचे १० लाखांचे अर्थसहाय्य घोषित

करिअरनामा । राज्यातील तरुण उद्यमींसाठी राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. स्टार्टअप्सना पेटंट मिळण्यासाठी येत असलेल्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकार तरुणांना आर्थिक मदत करणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार तरुण उद्योजकांना स्टार्टअप्सना पेटंट मिळण्यासाठी राज्य सरकारने १० लाखांचे आर्थिक सहाय्य करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी ट्विटरवर दिली आहे.

पेटंटसाठी १० लाखांच्या आर्थिक मदतीसोबतच गुणवत्ता परीक्षण व प्रमाणपत्राच्या खर्चासाठी ₹२ लाख किंवा एकूण खर्चाच्या ८०% मर्यादेत अर्थसहाय्य करण्याचा महत्वपूर्ण निर्णयही राज्य शासनाने घेतला आहे. राज्य निर्णयामुळे तरुणाच्या कौशल्याला नक्कीच वाव मिळेल अशी भावना आमदार धीरज देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

राज्य सरकारने तरुणांसाठी घेतलेल्या या निर्णयासाठी आमदार धीरज देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक तसेच महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत.