Kotwal Bharti 2023 : राज्यात तब्बल 5 हजार कोतवाल पदे भरणार; ‘या’ तारखेला होणार परीक्षा

करिअरनामा ऑनलाईन । राज्यभरात आता तब्बल 5 हजार (Kotwal Bharti 2023) कोतवाल पदे भरली जाणार आहेत. राज्य शासनाकडून भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 20 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता लेखी परीक्षा होणार आहे. रिक्त पदांच्या 80 टक्केपर्यंत मर्यादित कोतवाल पदे भरली जाणार आहेत. सध्या तलाठी भरती प्रक्रिया सुरु असून यानंतर कोतवाल भरती झाल्यास महसूल विभागाच्या कामास गती येणार आहे.

80 टक्के पदे भरणार
राज्यभरात गावांमध्ये महसूल विभागाचे व शासनाच्या बहुतांश कामांची पूर्तता करण्यासाठी कोतवाल पद महत्त्वाचे ठरले आहे. गेली अनेक वर्ष कोतवाल पदाची भरती व्हावी; अशी मागणी होत होती. राज्य शासनाने तलाठी भरती प्रक्रिया सुरू केली असतानाच कोतवाल भरती प्रक्रिया करण्यासंदर्भात भरती (Kotwal Bharti 2023) प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 21 जुलै रोजी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नियोजनातून भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यातील जिल्ह्यांमध्ये रिक्त पदांच्या 80 टक्के पर्यंत मर्यादित ही कोतवाल पदे भरली जाणार आहेत. विशेष बाब म्हणून या भरतीला शासनाने मान्यता दिली आहे.
भरती संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियमांचे काटेकोर पालन करून 15 ऑगस्ट 2023 पूर्वी भरती प्रक्रिया पार पाडावी अशा लेखी सूचना दिल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भरती प्रक्रिया करण्याच्या सूचना निगमित केल्या (Kotwal Bharti 2023) आहेत. यामुळे लवकरच कोतवाल पदे भरली जाणार असून महसूल विभागाच्या कामात सुसूत्रता व गतिमानता येईल आणि शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होतील अशी आशा आहे. दरम्यान, भरती प्रक्रियेत सज्ज्यानुसार भरती प्रक्रिया न घेता तालुका स्तरावर भरती घ्यावी, यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना संधी मिळेल आणि गुणवत्तायुक्त विद्यार्थी भरती होतील, अशी मागणी होत आहे.

5 हजार पदे रिक्त (Kotwal Bharti 2023)
तब्बल सहा वर्षानंतर कोतवाल भरती होत आहे. राज्यात 12 हजार 667 पदे मंजूर असून 8 हजार पदे कार्यरत आहेत. सध्या सुमारे 5 हजार पदे भरण्यात येणार आहेत. तलाठी सज्जा पुनर्रचनेनुसार 16 हजार पदे भरणे अपेक्षित आहे. पुनर्रचना व रिक्त पदांनुसार 80 टक्के पदे भरली जाणार आहेत. अनेक कोतवाल कोरोना काळात कामावर असताना मृत्यूमुखी पडले आहेत. अशा कोतवालांच्या पाल्यांना अनुकंपाखाली सामावून घ्यावे; अशी मागणी कोतवाल संघटनेचे राज्याध्यक्ष शिवप्रसाद देवणे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com