मोठी बातमी! UGC च्या गाईडलाइन नंतरही ठाकरे सरकार अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णयावरच ठाम  

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली आज दुपारी एक वाजता एक महत्त्वाची बैठक पार पडली. राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची मंत्रालयात ही बैठक झाली. यावेळी विद्यापीठ अंतिम परीक्षांसंदर्भात चर्चा झाली असून UGC ने दिलेल्या गाईडलाईन नंतर सुद्धा अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा पूर्वीचाच निर्णय कायम करण्यात आला. महाराष्ट्रासह सहा राज्यांनी विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास विरोध केला आहे तरी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्पष्ट केले होते.

गुणवत्ता आणि भविष्यातील संधीसाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यांकन महत्त्वाचे आहे असेही मंत्रालयाचे म्हणणे आहे. कोरोनाच्या महामारीमुळे विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास महाराष्ट्राचा विरोध होता. महाराष्ट्रासह पंजाब, ओदिशा, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि दिल्ली यांनाही जाहीरपणे आपला विरोध दर्शवला आहे. मात्र विद्यापीठ अनुदान आयोगाने  गेल्या आठवडय़ात सुधारित मार्गदर्शक सूचना लागू करताना विद्यापीठांच्या परीक्षा जुलैऐवजी सप्टेंबरमध्ये घेतल्या जातील, असे सांगितले होते. ‘यूजीसी’च्या एप्रिलमधील सूचनेनुसार या परीक्षा जुलैमध्ये घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. पण आता परीक्षा घेतल्या जाणार नाहीत यावर शिक्कामोर्तब झाला आहे. उदय सामंत यांनी आपल्या ट्विटरवरून याची घोषणा केली आहे.

कोणत्याही शैक्षणिक व्यवस्थेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यांकन महत्त्वाचे आहे. परीक्षांमधील विद्यार्थ्यांची कामगिरी त्यांना आत्मविश्वास आणि समाधान देते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी परीक्षा अत्यंत महत्वाच्या असल्याचे आयोगाने म्हंटले होते. परंतु राज्यातील वाढती कोरोना स्थिती पाहता परीक्षा घेणे धोकादायक असल्याचे दिसून येते आहे. म्हणूनच अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय कायम कऱण्यात आला आहे.

नोकरी आणि करिअर विषयक अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com