दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा दिवाळीनंतरच

करिअरनामा ऑनलाईन ।कोरोनामुळे रखडलेली दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा दिवाळीनंतर घेण्याचे नियोजन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या स्तरावर सुरू आहे. परीक्षा केंद्रांची संख्या कमी करून तालुक्‍याच्या ठिकाणी एकाच केंद्रात सोशल डिस्टन्स राखून ही परीक्षा घेण्याचा विचार सुरू आहे.

दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी राज्यात सुमारे एक लाख ८० हजार विद्यार्थी पात्र आहेत. फेब्रुवारी, मार्चमध्ये झालेल्या परीक्षेत हे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांच्या कपाळावरील ‘नापास’ हा शिक्का पुसला जावा, यासाठी तत्कालीन भाजप सरकारने पुरवणी परीक्षेला सुरवात केली. जूनमध्ये परीक्षांचे निकाल लागल्यावर जुलै किंवा ऑगस्टमध्ये तातडीने ही परीक्षा घेतली जायची, त्यामुळे प्रवेशाचा मार्ग खुला व्हायचा.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशाचा मार्ग यामुळे खुला व्हायचा. एटीकेटी विद्यार्थ्यांना दोन परीक्षांची संधी दिली जात होती. कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या नियमित परीक्षा तसेच फेरपरीक्षेचे वेळापत्रक कोलमडले. कोरोनामुळे सोशल डिस्टन्स राखून परीक्षा घेणे कठीण आहे. विद्यार्थ्यांची संख्याच मोठी असल्याने राज्य मंडळासमोर अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे जुलै, ऑगस्टमध्ये होणारी परीक्षा पुढे गेली. या पार्श्‍वभूमीवर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com