त्या ध्येयवेड्या युवकाने केली दिल्ली ते कारगील ‘तिरंगा’ दौड… !

रोजगार विश्व | अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील कांडली येथील एका २२ वर्षीय तरुणाने भारतीय सैन्यदलात भरती होण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी खांद्यावर तिरंगा घेऊन दिल्ली ते कारगील, अशी दौड लावली आहे. सुमित गौर असं या युवकाचं नाव आहे. ५ डिसेंबरला दिल्लीच्या इंडिया गेटवरून तो कारगीलच्या दिशेने निघाला. १०६८ किलोमीटरचे हे अंतर पूर्ण करून भारतीय सैन्यदलाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना तो भेटणार आहे.

तसेच या अधिकाऱ्यांची भेट घेऊन तो सैन्यदलात भरती करून घेण्याबाबत विनवणी करणार आहे. लहानपणापासूनच देशभक्ती आणि सैन्यदलाप्रती ओढ असलेल्या सुमितने इयत्ता बारावीनंतर शिक्षण सोडले. सैन्यात भरती होण्याकरिता आवश्यक शारीरिक व मानसिकदृष्ट्या स्वत:ला सक्षम बनविले. तसेच आपली शारीरिक क्षमताही सिद्ध केली. प्रत्येक बाबतीत सरस ठरलेल्या सुमितचे भरती परीक्षे दरम्यान संबंधित यंत्रणेने कौतुकही केले.

मात्र  प्रत्येक वेळी काही सेंटीमिटरच्या उंचीअभावी तो मागे राहिला.दरम्यान, देशप्रेम आणि देशसेवेच्या अनुषंगाने सुमितने परत एकदा प्रयत्न करण्याचा विचार केला आणि सैन्यात भरती होण्याकरिता ही दिल्ली ते कारगील दौड त्याने सुरू केली. रस्त्याची त्याला फारशी माहिती नसली तर नॅशनल हायवेच्या मदतीने तो कारगीलच्या दिशेने सोनीपत, पाणीपत, पठाणकोटच्या पुढे निघाला आहे.