कुठलाही कोचिंग क्लास न लावता तिनं मिळविला IITमध्ये प्रवेश; परभणीच्या अंकिता मानेची कमाल

परभणी । इंजिनिअर होऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयआयटीत प्रवेश मिळवणे एक स्वप्न असते. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत, चिकाटी आणि अभ्यासासोबत चांगला कोचिंग क्लासला प्रवेश घेणे हे आता समीकरण बनलं आहे. महागडा कोचिंग क्लास म्हणजे आयआयटीत प्रवेशाची गुरुकिल्ली असा समज विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांत रूढ झाला आहे. म्हणूनचं खासगी क्लासेसचा एक मोठा व्यवसाय उभा राहिला आहे. आयआयटीत प्रवेश मिळवण्यासाठी संपूर्ण देशभरात कोटा नावाचं शहर तर विद्यार्थ्यांसाठी जणू काही तीर्थचं बनलं आहे. मात्र, अशा सर्वात कुठल्याही मोठ्या शहरात क्लास न लावता घरीच आपल्या जिद्दीने थेट आयआयटीत अभियांत्रिकी पदवी मिळवण्याचं स्वप्न परभणीच्या अंकिता माने हिने पूर्ण केलं आहे. नुकत्याच झालेल्या जेईई अॅडव्हांस या परीक्षेत तिने देशात 793वा रँक मिळवलाय.

परभणी शहरातील अर्जुनराव माने यांना 2 मुली. त्यांचा व्यवसायही फार मोठा नाही, कारेगाव रस्त्यावर बांगड्यांचे दुकान. जेमतेम अशी आर्थिक परिस्थिती. त्यामुळे कुटुंबातील दोन मुली या अत्यंत हुशार असताना सुध्दा इतरांप्रमाणे ते मुलींना कोटा किंवा अन्य महानगरांकडे शिकावयास पाठवू शकले नाहीत. परंतु माने कुटुंबातील अंकिता हीने अगदी जिद्दीने आणि योग्य अशा मार्गदर्शनाच्या बळावरच आयआयटी इंजिनिअरिंगचं आपल्या स्वप्नपूर्तीचा संकल्प सोडला. परभणी सारख्या ठिकाणीच राहून, योग्य पध्दतीने अभ्यास करत यशसुध्दा पटकावलं. नुकताच जेईई अ‍ॅडव्हान्सचा निकाल जाहीर झाला. त्यात अंकिता हिने 793 रँक पटकावला. अन् ती आयआयटी इंजिनिअरिंगसाठी पात्र ठरली. तेव्हा अंकितासह माने कुटुंबियांचा आनंद अक्षरशः गगनात मावेनासा झाला होता. या आनंदवार्तेने तिच्या आई-वडीलाच्या डोळ्यातून आनंदाश्रूच आले.

अंकिता ही कृषी सारथी कॉलनीतील गांधी विद्यालयाची विद्यार्थिनी. तेथूनच ती इयत्ता दहावी उत्तीर्ण झाली. त्याचवेळी तिने इंजिनिअर करून आई-वडीलांना मदत करायची असाच निर्धार केला होता. त्यासाठी तीने बारावीच्या विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. पाठोपाठ अभ्यासात सातत्य राखलं, दिवसातून नऊ ते दहा तास अभ्यास केला. अभ्यासाचे योग्य नियोजन केले. त्यामुळेच अंकिता आपल्या स्वप्नपूर्तीचा संकल्प पूर्ण करू शकली.

आयआयटीमधून इंजिनिअरिंग करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. ते स्वप्न आज पूर्ण झाले. असे स्पष्ट करीत आयआयटीमध्ये इंजिअरिंग पूर्ण केल्यानंतर युपीएससी परीक्षा देऊन जिल्हाधिकारी होण्याचे आपले स्वप्न आहे, असे ती म्हणाली शिवाय अंकिताने इयत्ता बारावीत गणितात 100 पैकी 100 गुण पटकावले. त्याचवेळी तिची चुणूक दिसून आली. तिने अभ्यासाचे नियोजन करतांनाच अंगी जिद्द, योग्य मार्गदर्शन असेल तर कोटा, पुणे, औरंगाबाद या ठिकाणी न जाताही येथे राहूनसुध्दा निकाल येतो असा आत्मविश्वास अंकिता ने बोलुन दाखवलाय.