UPSC Success Story : ना मुंबई…ना दिल्ली…गावातच राहून केला अभ्यास…आज आहे IAS; पाहूया तमाम युवकांना बळ देणारा एक बळकट प्रवास

करिअरनामा ऑनलाईन । सर्वसामान्य कुटुंबातला ओंकार पवार हा तरुण सातारा जिल्ह्यातील (UPSC Success Story) जावली तालुक्यात त्याचं गाव आहे. UPSC साठी विद्यार्थी पुणे, मुंबई किंवा दिल्लीला जातात हे तुम्हाला माहित आहेच. पण ओंकारच्या यशाचं एक वैशिष्ट्य आहे. त्याने गावात आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यासमोर राहूनच हे यश मिळवलंय. गेल्या वर्षीच्या UPSCच्या परीक्षेतही त्याने 455 वी रँक घेऊन IPS ही पोस्ट मिळवली होती.. पण आयएएस होणं हे त्याचं स्वप्न होतं.. धाडसी निर्णय घेत पुन्हा एकदा परीक्षा द्यायची ठरवलं आणि आज प्रचंड मोठं यश त्याने पदरी पाडून घेतलंय..

IPS झाला तरी चैन पडेना… मग पुन्हा एकदा भरला फॉर्म 

ओंकार पवार याचे प्राथमिक शिक्षण हे सनपानेच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले होते. तर माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत झाले. ओंकारने मागील वर्षी UPSC परीक्षेत 455 वी रँक मिळवली होती. त्यानंतर तो IPS पदावर रुजू झाला. पण ओंकारला IAS होण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून ओंकारने पुन्हा एकदा UPSC ची परीक्षा देण्याचं ठरवलं आणि या परीक्षेत त्याने घवघवीत यश मिळवलं आहे. 2021 मध्ये झालेल्या UPSC परीक्षेतओंकार देशात 144 वा क्रमांक पटकावत IAS अधिकारी झाला आहे.

पुणं सोडलं … गावातच राहून केली तयारी

ओंकारचं प्राथमिक शिक्षण सनपाने गावात तर माध्यमिक शिक्षण हुमगाव इथे झालं. पुण्यात इंजिनिअरिंग पूर्ण करून त्याने UPSC ची तयारी केली. गेल्या दोन वर्षात ओंकारने गावात राहूनच UPSC ची सर्व तयारी केली आहे. अतिशय सामान्य कुटुंबातील असलेल्या ओंकारचे आई-वडील शेती करतात. तो घरातील पहिला अधिकारी झाल्यामुळे संपूर्ण घरात आणि गावात सध्या उत्साहाचे वातावरण आहे.

तरुणांसाठी ओंकाराचा सल्ला (UPSC Success Story)

ओंकारला त्याच्या यशाविषयी विचारले असता तो म्हणाला, ” आजकाल स्पर्धा परीक्षेत पास होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आजचा तरुण पास झाला नाही तर नैराश्येत जाऊ लागला आहे. त्यामुळे MPSC किंवा UPSC हे आयुष्य नाही हा एक करिअरचा ऑप्शन आहे. त्यामुळे परीक्षेत पास झालो तरी आपण आयुष्यात फेल होत नाही, हे आजच्या तरुण पिढीने लक्षात ठेवावे.” असा सल्ला ओंकार पवार याने दिला आहे.

“दिवसांत २ तास खेळायचो”

UPSC परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना ओंकार सांगतो; “अभ्यास करताना १२ ते १४ तास अभ्यास करणं शक्य होत नाही. यासाठी फक्त दिवसाप्रमाणे टाइम टेबल न बनवता ते डेली टाईम टेबल, विकली टाईम टेबल आणि मंथली टाईम टेबल असं टाइम टेबल बनवायला हवं. यामध्ये वेळेचं नियोजन अचूक होणं गरजेचं आहे. मी दररोज ७ ते ८ तास अभ्यास करायचो. दिवसातले २ तास मी पोहायचो, रनिंग करायचो किंवा क्रिकेट खेळायचो. अभ्यासासोबत मी माझ्या खेळण्याचा छंद जोपासला होता. हैद्राबादला मेन्स परीक्षेला जाण्यापूर्वी मी मुंबईत ४ दिवस क्रिकेटची टूर्नामेंट खेळलो होतो. त्याप्रमाणे मी माझ्या अभ्यासाचं नियोजन केलं होतं. UPSC करणं म्हणजे जगाच्या बाहेर जाणं असा त्याचा अर्थ नाही. त्यामुळं स्वतःचे छंद जोपासत तुम्ही वेळेचे नियोजन करा.”

“ओंकार ८ वीत असतानाच IAS व्हायचं ठरवलं होतं”

ओंकारचे वडील शेती करतात. शेतीला जोड धंदा म्हणून ते गायी, म्हैशी पालन आणि फोटोचा व्यवसायही करतात. या उत्पन्नावर त्यांनी ओंकारचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याचे वडील सांगतात, “ओंकारमधील चुणूक ओळखून तो आठवीत असतानाच आम्ही ठरवलं होतं की ओंकारने IAS अधिकारी व्हायचं. त्याप्रमाणे आम्ही त्याला शिक्षणाच्या सुविधा पुरवल्या. UPSC चा प्रवास हा कुटुंबियांसाठी आणि ओंकारसाठी खडतर होता पण आम्ही त्यात तरुण गेलो. यामध्ये आम्हाला आमचे मावस भाऊ संजय पवार यांनी आम्हाला आर्थिक सहकार्य केलं. ओंकारने घेतलेल्या कठोर मेहनतीमुळे आजचा दिवस आम्हाला पाहायला मिळाला.”

केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करणं अनेक तरुण तरुणींचं स्वप्न असतं. देशातील ही सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांची निवड प्रतिष्ठीत अशा सनदी अधिकारी पदांवर होते. साताऱ्याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या अशाच एका तरुणाने आपलं सनदी अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com