दहावी, बारावी पुरवणी परीक्षेला आजपासून सुरुवात

करिअरनामा ऑनलाईन ।महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेला आज शुक्रवार २० नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने परीक्षा केंद्रावर थर्मल गनद्वारे तपासणी, सॅनिटायझर, मास्कचा वापर आवश्यक करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी गुरुवारी दिली.

राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावी पुरवणी परीक्षेस करोनामुळे विलंब झाला. जुलै-ऑगस्टमध्ये होणारी परीक्षा तीन महिने उशिराने होत आहे. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मंडळाने विविध उपाययोजना केल्या आहेत. परीक्षा केंद्रावर थर्मल गन, सॅनिटायझरसह पर्यवेक्षक, केंद्रप्रमुखांना मास्क खरेदीसाठी मंडळाने निधी खर्च केला आहे. परीक्षेच्या पूर्व संध्येला शहरातील अनेक परीक्षा केंद्रांनी वर्गखोल्या सॅनिटाइझ करून घेतल्या. याच बरोबर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना पेपरला अर्धा ते एक तास अगोदर यायचे आहे; तसेच परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांची थर्मल गनद्वारे तपासणी करुन वर्गखोलीत प्रवेश देण्यात येणार आहे.

सकाळी १०:३० ते १:३० यावेळेत पेपर होणार असून, केंद्रात येतांना मास्क बंधनकारक आहे. एका बाकावर एकच विद्यार्थी बसवण्यात येणार असून, एका परीक्षा कक्षात १२ किंवा १३ परीक्षार्थींची बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. राज्यातून इयत्ता दहावीचे ४२ हजार ६३४ विद्यार्थी ३५५ केंद्रांवर, तर बारावीचे ६७ हजार ६०३ विद्यार्थी ३१७ केंद्रांवर परीक्षा देणार आहेत.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com