दिल्लीत UPSC करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांसाठी विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था करा – सुप्रिया सुळे

मुंबई । व्हायरस विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देश सध्या लॉकडाउन आहे. यामुळे देशाच्या अनेक भागांत स्थलांतरित कामगार,पर्यटक अडकून पडले आहेत. महाराष्ट्रातील अनेक मराठी विद्यार्थी दिल्ली येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी जातात. आता लॉकडाउनमूळे दिल्लीत अडकलेल्या अशा विद्यार्थ्यांकरिता विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

युपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी दिल्ली येथे अडकले आहेत. कृपया नवी दिल्लीहून मुंबई व पुण्याला एक विशेष रेल्वे गाडी पाठवावी. जेणेकरुन हे विद्यार्थी महाराष्ट्रात परत आपल्या घरी परतू शकतील अशी विनंती खासदार सुळे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना केली आहे. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही सदर प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची विनंती सुळे यांनी केली आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन करत सुळे यांनी दिल्लीतील स्पर्धापरीक्षा विद्यार्थ्यांना धीर दिला आहे. पुण्यातहि राज्याच्या विविध भागांतील विद्यार्थी अडकले आहेत. त्यांनाही आपआपल्या गावी जात यावे याकरता शासकीय पातळीवर प्रयत्न सुरु असून लवकरच याबाबत माहिती देण्यात येणार आहे.