10th Result 2020 : राज्याचा निकाल ९५.३० टक्के, यावर्षीही मुलींनीच बाजी मारली

मुंबई । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी एसएससी बोर्डाच्या परीक्षांचा निकाल उशिरानं जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल एकूण ९५.३० टक्के लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे. याही वेळी मुलींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे.

विद्यार्थीनी – ९६.९१ टक्के
विद्यार्थी – ९३.९० टक्के
यंदाही राज्यात मुली अव्वल
सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा
सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा
दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९२.७३ टक्के
मागील वर्षापेक्षा १८ टक्क्यांनी निकाल वाढला

कोकणाने मारली बाजी पुन्हा एक नंबर
विभाग

पुणे ९७.३४
औरंगाबाद ९२.००
नागपूर ९३.८४
नाशिक ९३.७३
मुंबई ९६.७२
कोल्हापूर ९७.६४
लातूर ९३.९
अमरावती ९५.१४
कोकण ९८.७७
नागपूर ९३.८४

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आज जाहीर झाला आहे. हा निकाल आज दुपारी १ वाजता पाहू शकणार आहेत.

मार्च २०२० मध्ये दहावी परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादीत केलेले गुण पुढील संकेतस्थळावरुन उपलब्ध होतील. ही माहितीची प्रत / प्रिंट घेता येईल. www.mahresult.nic.in, www.sscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com, www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

या ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून दहावी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांने संपादीत केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन http://verification.mh- ssc.ac.in स्वत: किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय या परीक्षेपासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

यासाठी आवश्यक अटी, शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी गुरुवार ३० जुलै २०२० ते शनिवार ८ ऑगस्ट २०२० पर्यंत व छायाप्रतीसाठी गुरुवार ३० जुलै २०२० ते मंगळवार १८ ऑगस्ट२०२० पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क डेबिट कार्ड, क्रिडेट कार्ड, युपीएल, नेटबँकिंगद्वारे भरता येईल.