21 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार शाळा; ‘या’ नियमांचे पालन करणे अनिवार्य

नवी दिल्ली | देशभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या कहरामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून सुरू असलेल्या या लॉकडाऊनमध्ये शाळा, रेल्वे आणि इतर महत्त्वपूर्ण संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता हळूहळू विविध सेवा पूर्ववत केल्या जात आहेत. मात्र यामध्ये शाळा सुरू होण्याबाबत पालकांचा नकारात्मक सूर दिसत होता. अशातच केंद्राने 21 सप्टेंबरपासून शाळा सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे.

असे असले तरी ऑनलाइन आणि डिस्टन्स लर्निगला यापुढेही परवानगी देण्यात आली आहे. इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी जाता येणार आहे. असे असताना विद्यार्थ्यांना पालकांच्या परवानगीचे पत्र आवश्यक असणार आहे. अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जाणार आहेत. केंद्र सरकारने या नियमांमध्ये असे नमूद केले आहे की कंटेन्मेंट झोनव्यतिरिक्त इतर शाळा खुली करण्याची परवानगी असेल. त्यामुळे कंटेन्मेंट झोनमध्ये राहणारे विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळेत जाण्याची परवानगी नसेल.

– शाळांमध्ये कोणतीही अॅक्टीव्हिटी सुरू करण्यापूर्वी यामध्ये वर्ग, प्रयोगशाळा, सर्वजण वावरत असल्याचा परिसरात 1 टक्के सोडिअम हायपोक्लोराइट सॉल्यूशनने सॅनिटाइज करावा. सातत्याने स्पर्श होणाऱ्या भागात वारंवार सॅनिटायजेशन करावे.

-शिक्षण व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग (50 टक्क्यांपर्यंत) यांना शाळांमध्ये ऑनलाइन टिचिंग किंवा टेली काऊन्सिलींग वा इतर कामांसाठी बोलावण्यात येईल.

-प्रत्येक वेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य असेल. दोन व्यक्तींमध्ये किमान 6 फूट अंतर असावे, त्यामुळे शाळांमध्ये बसण्याची रचना कोरोनाच्या नियमांनुसार करावी.