आता गुणपत्रिकेवर श्रेणी बरोबर टक्केवारीही असणार – शिक्षण मंत्री उदय सामंत 

करिअरनामा । “विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर श्रेणी बरोबर टक्केवारी नमूद असणार आहे” असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

राज्यातील विविध विद्यापीठांमार्फत गुण देताना विभिन्न पद्धतींचा वापर केला जातो. त्यामुळे इतर ठिकाणी प्रवेश घेताना आणि नोकरीसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो. काही ठिकाणी टक्केवारीची आवश्यकता असते. अशावेळी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

अकृषी विद्यापीठांद्वारे देण्यात येणाऱ्या पदवी/ पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे गुण देण्याच्या पद्धतीमध्ये एकसारखेपणा असावा यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून श्रेणी बरोबर गुणपत्रिकेवर टक्केवारी नमूद करण्यात यावी.

तसेच शेवटच्या वर्षातील दोन सत्राचे गुण किंवा द्वितीय व तृतीय वर्षातील सर्व सत्रांचे गुण मिळून पदवी न देता पदवीचा संपूर्ण कालावधी धरून सर्व सत्रांचे गुण विचारात घेऊन पदवी देण्यात यावी, असेही मत सामंत यांनी व्यक्त केले.

नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”