राज्यातील परीक्षांच्या वेळापत्रकांबाबत सुप्रिया सुळे म्हणतात…

मुंबई । लॉकडाउनचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर ३ मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. लॉकडाउनमुळे राज्यातील काही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लॉकडाऊन कधी पर्यंत चालणार याबाबत अनिश्चतता असताना विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत हवालदिल झाले आहे. दरम्यान, येत्या दोन आठवड्यांमध्ये म्हणजेच १० मे पर्यंत राज्यातील परीक्षांचं चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. आज त्यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

“सध्या लॉकडाउनमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी बोनस वेळ मिळाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास सुरूच ठेवावा. येत्या १० मे पर्यंत परीक्षांबाबत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. मंत्री उदय सामंत यांच्याशी या विषयावर चर्चा झाली आहे. ते यावर काम करत आहेत आणि लवकरच सर्वांसमोर चित्र स्पष्ट होईल,” असं सुळे यावेळी म्हणाल्या.

लॉकडाऊन उठवण्याबाबत त्या म्हणाल्या, ”देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणायची आहे. त्यामुळे अनलॉकिंग हळूहळू सुरू झालं पाहिजे हे माझं मत आहे. मौजमजेसाठी किंवा कॅफेत जाण्यासाठी नव्हे तर देश आणि राज्याला उभं करण्यासाठी आणि आपली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी लॉकडाऊन शिथिल झालंच पाहिजे, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. लॉकडाऊन घाईघाईत उठवून चालणार नाही.तर टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उठवलं पाहिजे. सांगतानाच लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत काही सूचना असतील तर अवश्य कळवा,” असं आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”