MPSCने निगेटीव्ह मार्किंग पद्धतीत केल्या ‘या’ मोठ्या सुधारणा

करिअरनामा । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांकरिता नकारात्मक गुण देण्याच्या पद्धतीत (Negative Marking) सुधारणा केल्या आहेत. यातील महत्त्वाचा बदल म्हणजे यापुढे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येणार आहेत. म्हणजेच यापुढे निकाल अपुर्णांकात लागणार आहे.

यापूर्वी, विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांकरीता (multiple choice questions) ४ चुकीच्या उत्तरांबद्दल एक गुण वजा करण्याबाबतची नकारात्मक गुणांची पद्धत (निगेटिव्ह मार्किंग) २००९ मध्ये प्रथम लागू करण्यात आली होती. त्यानंतर नकारात्मक गुण वजा करण्याची कार्यपद्धती काही बदलांसह अबलंबिवण्यात आली. या कार्य पद्धतीचा आढावा घेण्यात आला आणि पुढीलप्रमाणे कार्यपद्धती अवलंबण्याचा निर्णय घेण्यात आला.

१) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) नवीन गुणपद्धतीनुसार प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी २५ टक्के किंवा एक चतुर्थांश एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येणार आहेत.,’ अशी माहिती ‘एमपीएससी’ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
२) एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजले जाईल आणि त्या प्रश्नाच्या उत्तरामधून २५ टक्के किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.
३) हा नियम लागू करताना अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकांत आली, तरीही ती अपूर्णांकांतच राहील.
४) एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर, त्यास नकारात्मक गुणपद्धत लागू होणार नाही.

नवीन गुणपद्धत सर्व स्पर्धा परीक्षा, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आणि चाळणी परीक्षांसाठी लागू असेल, असे ‘MPSC’च्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आले आहे.