अभिमानास्पद! पती सीमेवर करतो देशसेवा, पत्नी तहसिलदार होऊन लोकसेवेत

करिअरनामा ऑनलाईन । भारतात गेल्या काही वर्षात स्त्री पुरुष समानता आली असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र आजही काही ठिकाणी मुली या केवळ चांगला नवरा मिळावा म्हणून शिक्षण घेताना दिसतात. लग्नानंतर अनेक मुलींना शिक्षण सोडावे लागते मग नोकरी तर खूप दूरचा प्रश्न आहे. इंद्रायणी गोमासे यांची कथा थोडीशी वेगळी आहे. लग्नानंतर शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षा देऊन त्यांनी यश मिळविले आहे. नुकत्याच लागलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्या  तहसीलदार झाल्या आहेत.

वडिलांकडे ३ एकर शेती मात्र तेवढ्या शेतीत तीन मुली आणि एका मुलाला सांभाळण्याची जबाबदारी अंगावर होती. पण म्हणून त्यांनी मुलींचे शिक्षण थांबवले नाही. शेतीच्या जीवावर त्यांनी मुलींचे शिक्षण करून त्यांची लग्नं लावून दिली. इंद्रायणी यांचे पती लग्नानंतर सीआरपीएफ मध्ये दाखल झाले. सध्या ते छत्तीसगढ सीमेवर देशाच्या सेवेत रुजू आहेत. त्यांचे इतर कुटुंब शेतीवर अवलंबून आहे. मात्र इंद्रायणी यांच्या सासरच्यांनी देखील त्यांच्या पुढील शिक्षणावर आक्षेप घेतला नाही. याच प्रोत्साहनामुळे कृषी पदविकेत १० पुरस्कार मिळविले, ज्यामध्ये ५ सुवर्ण, ३ रोख व २ रजत पुरस्कार यांचा समावेश आहे.

कृषी पदवी मिळाल्यांनतर शासकीय कार्यालयात नोकरी केल्यास शासकीय योजना सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील. अन्यथा एरवी एवढे संशोधन होते, योजना राबविल्या जातात मात्र त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. म्हणून त्यांनी पुण्यात खाजगी ट्युशन घेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. ओबीसी प्रवर्गातून त्या राज्यात दुसरा क्रमांक मिळवून त्या तहसीलदार झाल्या आहेत. ईच्छा असेल तर केव्हाही आणि कसेही यश प्राप्त करता येते हे त्यांनी सिद्ध केले आहे.

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com