मागच्या वर्षी प्रिलिम्स निघाली होती..यावर्षी ती पण नाही ?? मग हे वाचाच

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीति, भाग ७| नितिन ब-हाटे 

“हारने वालो का भी, अपना एक रुदबा होता हैं,
अफसोस तो वो करे, जो दौड मैं शामील ना थे “

या‌ थाटात तुम्ही रममाण असाल तर आत्मपरीक्षण(self-introspection) करण्याची नितांत गरज आहे, कारण आपण ज्या दौड मध्ये शामील झालो आहोत तिथं आपण नेमके कुठे आहोत, आपल्या पुढे किती स्पर्धक आहेत?, आपण आधीपेक्षा किती प्रगल्भ झालो आहोत ?, या‌ वयात आपण कुठे असणार होतो?, ही दौड कधी संपणार आहे?, आपले अटेम्ट का राहतायत?, पोस्ट निघणारं‌ वर्ष नेमके कोणते आहे? या सर्वांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला तरच रुदबा(पद) मिळेल. नाहीतर जिदंगीभर अफसोस करावा लागेल, हारणं कधीच वाईट नाही पण “का हारलो…?” हे न शोधणं खुप वाईट आहे. या लेखात ते शोधण्याचा प्रयत्न करु…

स्पर्धापरिक्षेची दौड सामुहिकरित्या भासत असली तरी वैयक्तिकच आहे, “जागा कितीही येऊ दे मला एकचं पोस्ट पाहिजे….”, “यावर्षी आपली पोस्ट फिक्स….”असं सामुहिकरित्या चहाच्या कट्ट्यावर बोलुन वैयक्तिक पातळीवर कृतीत आणलं नाही तर चहाचा कट्टा बदलावा लागतो. याउलट पोस्ट मिळवणारे वैयक्तिक पातळीवर चालु घडामोडी अपडेट्स करीत असतात, वाचलेल्या गोष्टी रिव्हाईस करीत राहतात, स्वतःच्या चुकांवर आणि कमतरतांवर काम करीत राहतात. त्यांचा प्राधान्यक्रम ठरलेला असतो,‌ विचारांची स्पष्टता, कामातील सातत्य, अभ्यासाचे नियोजन, निर्णयातील समतोलपणा, विचार(thought) आणि कृती(action) मधील कमी करत गेलेलं अंतर त्यांना पोस्ट मिळवुन देतं, आणि नंतर तेच चहाच्या कट्ट्यावर चर्चेचा विषय ठरतात, “तो आमच्या अभ्यासिकेत होता, आज IAS/DC आहे.”

इतर महत्वाचे –

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा-2019 जाहीर

तुम्ही सुंदर डान्स करता? मग त्यातच करिअर करा

आता तुम्ही परिक्षेच्या कोणत्या टप्प्यावर आहात आणि का आहात ….? मागच्या वेळेस प्रिलिम निघाली होती यावर्षी तर तीपण का नाही निघाली……? काहीतरी चुकतंय…? याचं कारण तुमच्या आतापर्यंतच्या केलेल्या अभ्यासात, वाचलेल्या पुस्तकात आणि घेतलेल्या निर्णयात आहे. मार्गदर्शक निवडीपासुन रुम, मेस, जागा, अभ्यासमित्र, पुस्तके, विषय आणि पदापर्यंत…..या सर्वांच्या निवडीत आहे. स्वतःच्या स्वभाव, सवयी, अभ्यासपद्धती इत्यादीचं आकलन होणं गरजेचं आहे

UPSC/MPSC मध्ये 3/4 वर्षे गुंतवणूक केल्यानंतर वेळोवेळी स्वःताचे आत्मपरीक्षण(SWOT analysis) केले पाहिजे कारण आपल्या प्रयत्नाच्या दिशेत धोलपुर हाऊस किंवा यशदा लागणार नसेल तर प्रवास व्यर्थ आहे,
रिझल्ट येतं नाही म्हणजे अपुरे प्रयत्न, कमी मेहनत, नकोत्या गोष्टीमध्ये वेळेचा अपव्यय, चुकीची अभ्यासशैली, संकल्पनांची अस्पष्टता, बेसिक माहितीचा अभाव, कामातील आळस, पेपर सरावातील चालढकल, चुकीच्या वेळेत चुकीचा विषय, अभ्यासाची चुकीची दिशा, योग्य मार्गदर्शकाचा अभाव, एकाच वेळी दोन दगडांवर पाय, आणि अनियमितता ही कारणं स्पष्ट आहेत. बाकी यावर्षी जागा आलेल्या नाहीत, नोटीफिकेशन आले नाही, मन लागत नाही, घरुन फोन आला होता, पैशाचा प्राॅब्लेम चालु आहे, पेपर कठिण काढला होता ही सगळी कारणं दुय्यम आहेत. कारण यश‌ फक्त त्यांनाच मिळते ज्यांना त्याची खरचं गरज आहे.

आता हे चक्रव्यूह भेदायचंय, यशाचा गुलाल उधाळायचाय..?…..नेमके काय शोधता येईल…?? काय करता येईल..??

१) “प्रथम आपलं चुकतंय हे स्विकार/मान्य करणे आणि काय चुकतंय ते शोधुन त्यांच्यावर लगेच काम करणे” म्हणजेच उपलब्ध वेळ, राहिलेला अभ्यास, प्राधान्य, ‘य’ पोस्ट मिळण्याची शक्यता इत्यादी चौकटीत नियोजन करणे. वेग , वेळ आणि आक्रमकता यानुसार काम करावे लागेल.

२) स्वतःचं चिकित्सक विश्लेषण(Critical Analysis) करुन संकल्पनांची स्पष्टता, तथ्यांचे पाठांतर, वाढलेला बुध्द्यांक , प्रगल्भतेचा स्तर इत्यादीचा अंदाज घेऊन कमकुवत विषय सरासरी पातळीवर आणणे आणि स्ट्राॅन्ग विषय अधिक पक्के करणे .

३) सावध‌ ऐका पुढल्या हाका….- स्पर्धापरिक्षामध्ये परिक्षा आणि स्वतःला समजुन घेतल्या शिवाय यश मिळणार नाही, आयोगाला अपेक्षित काय आहे माझी ते द्यायची किती तयारी झाली आहे ?अजुन किती द्यावं लागेल ? त्यासाठी आयोग आणि मी यांच्या अपेक्षांमधील अंतर कमी केलं पाहिजे.

४) भावनात्मक मजबुत – यश अपयश दुय्यम आहे, या प्रवासात तुम्ही स्वतःला सादर कसे करता, अपयश आलं तरी तुमच्यातला लढण्याचा आत्मविश्वास किती परिपक्व आहे , कौटुंबिक किंवा खाजगी आयुष्यातील समस्या कुशलतेने हाताळण्याच कसब तुमच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे, मानसिक आणि भावनात्मक दृष्टीने सक्षम असणे आवश्यक आहे.

५) कुछ नया चाहिऐ- रटाळ आणि चाकोरीबद्ध दिनक्रमामुळे अभ्यासात तोचतोचपणा आलाय का?? त्याच त्याच गोष्टी दिल्या की त्याचं गोष्टी रिटर्न मिळतात, दररोजच्या कामात नाविन्य शोधलं पाहिजे, वेळेनुसार लवचिक राहता आलं पाहिजे त्यामुळे पुर्ण प्रक्रिया एन्जाॅय करता येते.

६) आर्थिक चणचण – “२५ पर्यंत क्लासवन ,नंतर मिळेल ती पोस्ट” असे मार्गक्रमण असेल तर उपलब्ध वेळेनुसार काम झालं नाही त्यामुळे प्राधान्यक्रम बदलला हे सिद्ध होते, त्यात आर्थिक पेच आला तर लवकर जाग येणं आवश्यक आहे कारण या दुखण्याला इलाज म्हणजे एक वर्षाच्या खर्चाची सोय करणे, बचत करुन ठेवणं किंवा स्वतः कमवणे‌ आणि अपेक्षित कालावधी मध्ये पोस्ट मिळवुन मोकळं होणं. ठराविक वेळेनंतर नोकरी करुन अभ्यास करता येतो.

७) अधिकारीपणाच भुतं – अधिकारी होण्याआधीच बडेजाव करत हिडंण, मोठी पुस्तक घेऊन मिरवणं, रात्ररात्र भाषणांची तयारी करणं, विविध चर्चासत्रामध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा अतिरेक करणं इत्यादी भुतं उतरणे खुप अगत्याचे आहे. दहावी ला बोर्डात येण्यासाठी जसा जीवतोडुन अभ्यास केला होता तसा आता ही परिक्षा पास करण्यासाठी अभ्यास केला की पोस्ट मिळते.

८) मन रमत नाही(Isolation vs social)- लग्नसोहळा, पार्टया, कार्यक्रम इत्यादींमध्ये वाववरणं कठिण वाटतयं, करिअरसंबंधी प्रश्र्नांची उत्तर देता येत नाही तर मग काही काळ भुमिगत व्हा, पण मग त्यात तुमचा सोशल आत्मा हरवु देऊ नका, तुम्ही नेमके सोशल राहिलात की अभ्यास एन्जाॅय करता कि अलग(Isolate)होऊन ते शोधायला पाहिजे. मी नेमका बहिर्मुख (extrovert)व्यक्ति आहे की अंतर्मुख (Introvert) व्यक्ति आहे हे माहिती पाहिजे.

९) व्यक्तिगत दोष(Personality Error) – स्पर्धापरिक्षांचा संघर्ष व्यक्तिगत दोष दुरु केल्या शिवाय लढता येणार नाही, चुकीची जडलेली सवय, अहंकेद्री वृत्ती, बेजबाबदारपणा आणि इतर दोष दुर करण्यासाठी दररोज स्वतःवर काम करावं लागेल. निवड झालेला एक व्यक्ति एक “संस्था” म्हणुन घडलेला असतो ज्याच्या मनगटात आयुक्तालय, संपुर्ण जिल्हा सांभाळण्याची ताकद असते.

१०) स्वांन्त सुखाय(Psudo self entertainment)- वरील कोणत्याच पैलुवर काम केलं‌ नाही तर आपण आपल्या भोवती निर्माण केलेल्या स्वांन्त सुखाय रिंगणात स्वमनोरंजन करीत बसतो तयारी चालु आहे, एवढं संपलं एवढं राहिलं, यावर्षी नक्की पोस्ट निघेल असं वाटतंय ……इत्यादी मनकल्पना आखित बसतो याउलट ठोस आणि स्पष्ट दिसणारा अभ्यासाची ब्लु प्रिंट तयार असेल तर आपल्याच विश्वात रममाण फुग्याला वास्तवाची टाचणी टोचुन फोडता येते.

या रिंगणातुन लवकर बाहेर पडणे अपेक्षित आहे कारण या प्रक्रियेत‌ तुमचा वेळ निघुन जात असतो, इथे तुम्ही एकटे नसता, तुमच्या सोबत तुमचे आई-वडिल, बहिण, भाऊ ‌, जोडीदार, कुटुंब ,तुमचा समाज, आणि पुर्ण गाव गुंतलेला असतो, तुमच्या यशाचा फायदा तुमच्या गावतील शेवटच्या वेशीवरील लहान लेकराला होणार असतो. नंतर ठरविलेल्या गोष्टींना खुप अंतर असते, आज स्वतःवर काम केलं‌‌ नाही तर उद्या समाजावर काम करता येणार नाही, आज तुम्ही पोस्ट साठी अभ्यास करीत नसाल तर उद्या पोस्ट मिळणार नाही हे नक्की आहे.

अब हवाएँ ही करेंगी रौशनी का फ़ैसला
जिस दिए में जान होगी वो दिया रह जाएगा- महशर बदायुनी

Nitin Barhate UPSC MPSC

नितिन ब-हाटे

9867637685
(लेखक ‘लोकनीति IAS, मुंबई ‘ चे मुख्य समन्वयक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत)