UPSC 2020 प्रिलिम पास होण्यासाठी तयारी कशी करावी ??

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीति | नितिन ब-हाटे

नवीन वर्ष सुरु झाले, UPSC तयारीच्या वर्षातील. पहीला टप्पा संपला, आता बहुतेक विद्यार्थी मुख्य परीक्षेच्या तयारी कडुन पुर्व परीक्षेच्या तयारी कडे वळतील आणि अतिसुरक्षिततेसाठी मुख्य थोडी बाजुला ठेवून पुर्व परीक्षेकडे अधिक लक्ष केंद्रित केली पाहिजे.

तुम्हीही UPSC 2020 पुर्व परिक्षेची तुमची सक्षमता आताच तपासुन घ्या, कारण पुर्व परिक्षा ही IAS/IPS होण्याच्या मार्गातील प्राथमिक चाचणी आहे . तांत्रिक दृष्ट्या पुर्व परिक्षेचा अभ्यास मुख्य परिक्षेच्या अभ्यासक्रमातच पुर्ण होत असतो आणि फक्त मुख्य परिक्षेला नसलेले पुर्वला असलेले मुद्दे अभ्यासायचे असतात, काही शक्यतामध्ये परिक्षार्थी मुख्य परिक्षेचे सामान्य अध्ययन आणि वैकल्पिक विषय यामध्ये आकंठ बुडालेला असतो त्यामुळे पुर्व परिक्षा पद्धती आणि अभ्यासक्रम नंतरच्या दिवसांत उरकत नाही म्हणुन पुर्व परिक्षेकडे प्राधान्यक्रम देऊन त्यासंबंधीचा आत्मविश्वास आणि मेहनत याची आतापासूनच तयारी असावी म्हणुन सदर लेख

अनेक वेळा मुख्य परिक्षा दिलेले किंवा मुलाखत दिलेले परिक्षार्थींही पुर्व परिक्षेला गृहीत धरण्याची चुकी करत नाहीत, यु.पी.एस.सी.ही दरवर्षी नवीन परिक्षार्थी आणि सिनिअर परिक्षार्थी यांना समान आव्हानात्मक पातळीवर आणते

पुर्व आणि मुख्य परिक्षेचा अभ्यास समान असला तरी परिक्षा पद्धती आणि त्यांना हाताळण्याचा दृष्टीकोन वेगळा वेगळा आहे, पुर्वला अनुक्रमे तथ्याची वस्तुनिष्ठता आणि मुख्य परिक्षेला विश्लेषणात्मक मांडणी असते .प्रत्येक परिक्षार्थीच्या प्रवृत्ती आणि बुद्ध्यांकानुसार अनुक्रमे वस्तुनिष्ठता आणि विश्लेषणात्मक क्षमता कमी अधिक प्रमाणात असते, काहींना तथ्य विशेष पाठांतर/उजळणी न करता ही लक्षात राहतात तर काहींची विश्लेषणात्मक मांडणीची क्षमता प्रभावी असते त्यामुळे आपापल्या स्वभावानुसार पुर्व आणि मुख्य परिक्षेच्या तयारीला वेळ द्यावा

पुर्व परिक्षेला(पेपर 1) काय काय अपेक्षित आहे

1) विस्तृत आणि व्यापक वाचन(Extensive Reading) – पुर्व परिक्षा वस्तुनिष्ठ असल्याने मागील काही वर्षांतील चालु घडामोडी आणि त्यांच्या जोडीला अभ्यासक्रमातील मुळ संकल्पना असा अनंत माहीती आणि ज्ञानाचा खजिना आयोगा समोर 100 प्रश्नांमध्ये विचारण्यासाठी खुला असतो त्यातुन परिक्षार्थी म्हणुन आपण पोहोचु शकतो तेवढे मुद्दे आणि आयोगाचे प्रश्र्न यातील वारंवारता खुप मोठी असते त्यामुळे या माहीती आणि ज्ञानाच्या समुद्रात खोलवर जाण्याऐवजी जेवढं दुरवर जाता येईल तेवढं जाण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे त्यासाठी अभ्यासक्रमाला धरुन विस्तृत आणि व्यापक वाचन झाले पाहिजे म्हणजे पुर्वच्या प्रश्र्नांतील अधिकाधिक प्रश्र्न आपल्याला ओळखीचे वाटतील. हे विस्तृत आणि व्यापक वाचन आपण ठरवलेल्या अभ्याससाहित्याच्या आणि अभ्यासक्रमाच्या चौकटीच व्हायला हवे नाहीतर या ज्ञानसागरात आपली नौका भरकटुन जाईन .

2) मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका – पुर्व परिक्षेच्या अभ्यासात मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका रडार किंवा दिशादर्शकाची महत्त्वाची भुमिका पार पाडतात. मागील निदान 25 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि आकलन करुन घेतले पाहिजे, या प्रश्नपत्रिकांमध्ये दरवाचनाला नवीन क्लुप्त्या मिळत असतात अर्थात त्या फक्त यु.पी.एस.सी.चा नवीन वर्षीचा अनपेक्षित धक्का सहन करण्यासाठी सज्ज करतात, अभ्यासक्रमातील घटक आॅप्शनला टाकणे धोक्याचे ठरु शकते . मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांच बारकाईने विश्लेषण केल्यास पुर्व परिक्षेच्या प्रश्र्नाच्या पद्धती , प्रकार इत्यादी स्तरापर्यंत पोहचता येतं. यु.पी.एस.सी. च्या त्या स्तरापर्यंत पोहचणं आणि त्यानुसार पुर्वपरिक्षेची तयारी करणे म्हणजेच पुर्वचं चक्रव्युह समजले असे म्हणता येईल. अशा परिक्षार्थींचा मग मुख्य आणि मुलाखती वर जोर असतो.

3) तथ्य आणि संकल्पनांची स्पष्टता – पुर्व‌ परिक्षेमध्ये एक प्रश्र्न चुकला तर तुम्ही हजारो मध्ये मागे पडता, पुर्वचा कटऑफ नेहमी 50% लागतो आणि 100 पैकी पुर्ण अचुक उत्तर माहिती असलेले प्रश्र्नांची संख्या कमी असते म्हणुन ही संख्या वाढविण्यासाठी तथ्य आणि संकल्पनांची स्पष्टता असणे आवश्यक आहे.

4) चालु घडामोडी आणि बेसिक जोडणी – पुर्व परिक्षेमध्ये मागील काही वर्षांपासून चालु घडामोडी, अर्थशास्त्र, योजना, संस्था आणि इतिहास यावरील प्रश्र्नांची संख्या वाढली आहे. वृत्तपत्र, NCERTs आणि ठराविक संदर्भ ग्रंथ याआधारे पुर्व पास होता येतं त्यासाठी चालु घडामोडी आणि मुळ संकल्पना यांच्या जोडीत अभ्यास करणे अपेक्षित आहे. मागील वर्षीपासून परिक्षेपर्यंत चालु घडामोडी आणि मुळ संकल्पना यांची दैनंदिन टिपण आणि वेळोवळी अद्ययावतीकरण पुर्वचे मुद्दे गहाळ होण्यापासुन वाचवु शकते.

5) सराव चाचण्या – 2 वर्षे अभ्यास करणे‌ आणि 2 तासांच्या पुर्व परिक्षेत अचुक उत्तरा पर्यंत पोहचता न येणं किंवा 2 तासाचं नियोजन नसणे म्हणजे 2 वर्षाच्या मेहनत वाया जाते म्हणुन अभ्यासाबरोबरच वस्तुनिष्ठ सराव चाचण्या देणं आवश्यक आहे , सराव चाचण्या मुळे उत्तरातील अचुकता(accuracy) वाढते तसेच गेसवर्क , आॅप्शन एलिमिनेशन, पर्यायांबरोबर न भरकटणे , प्रश्र्न वाचल्या बरोबर योग्य उत्तर क्लिक होणे इत्यादी गोष्टी सुधारतात आणि आपले सक्षम आणि कमजोर घटक समजात त्यानुसार नियोजन करता येते त्यामुळे जास्तीत जास्त सराव चाचण्या वेळ लावुन सोडविल्या पाहिजेत. कोणत्याच क्लासेसच्या प्रश्नपत्रिका यु.पी.एस.सी च्या पातळीवरचे प्रश्र्न तयार करु शकली नाही त्या फक्त सरावासाठी उपयोगी पडतात. प्रत्यक्ष पुर्व परिक्षेत चुका टाळण्यासाठी सराव चाचण्या महत्त्वाची भूमिका बजावतात आणि आपल्याला आपल्या अभ्यासाचे मुल्यांकन ही करता येते.

6) दैनंदिन जीवनातील वाचन – यु.पी.एस.सी च वाचन पुस्तके, वृत्तपत्र यांच्या पलीकडे करायला पाहिजे कारण यु.पी.एस.सी चे प्रश्न पुस्तकांच्या चौकटीबाहेर आणि वृत्तपत्रच्या ओळी दरम्यान दडलेले असतात ते आपल्या दैनंदिन जीवनात आणि सभोवतालच्या परिसरात सापडतात त्यांच्याकडे डोळसपणे अभ्यासक्रमाचा चष्मा लावून पाहता आलं पाहिजे उदा. रस्त्यावर फिरताना चारचाकी गाडीवर BS6 असा स्टिकर दिसला तर त्यामागे दडलेले पर्यावरणासाठीचे प्रयत्न दिसले पाहिजे, शुद्ध पाणी पिताना शुद्धीकरणातील RO च रसायन समजले पाहिजे, भेट दिलेल्या ‌मंदीराची स्थापत्यकला शोधता आली पाहिजे आणि किटकॅट चाॅकलेट खाताना ब्रेकमध्ये त्याच्या रॅपर वरील माहिती कुतुहलतेने वाचता आली पाहिजे.
बाकी यु.पी.एस.सी सोपी आहे फक्त ती जगता आली पाहिजे.

पुर्व परिक्षेच चक्रव्युह भेदण्यासाठी वर्षभर “सातत्य” ठेवुन मेहनत घेणे‌ अपेक्षित आहे. मुख्य परिक्षेमध्ये 15 हजारातुन 3 हजारांत मुलाखतीसाठी निवडण्या पेक्षा पुर्व परिक्षेला 4ते5 लाखातुन 15 हजारांत येणं खुपचं आव्हानात्मक असते त्यादृष्टीने पुर्व परिक्षेच्या बीग फिल्टर समोर आपण घट्ट पाय रोवुन उभे रहावे म्हणुन ही पहिली वार्निंग.

नितिन ब-हाटे
9867637685
(लेखक ‘लोकनीति IAS, मुंबई’ चे मुख्य समन्वयक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत)