परीक्षेच्या आधी किती वेळ अभ्यास थांबवायचा..? घ्या जाणून

करिअरनामा । परीक्षा बिरीक्षा | राज्यात येत्या महिनाभरात दहावी आणि बारावीच्या परिक्षांचं वातावरण असणार आहे. बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेस सुरुवात झाली असून दहावीच्या परीक्षेस पंधरा दिवसांत सुरुवात होईल. परीक्षा सुरु असताना अभ्यास किती करायचा, पाठांतर कसं करायचं, काय काय लक्षात ठेवायचं या सगळ्या अडचणी विद्यार्थ्यांना भेडसावतात. प्रत्येकजण स्वतःच्या श्रद्धेनुसार, जुन्या अनुभवांनुसार परीक्षेचं वेळापत्रक आखत असतो. यातच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो तो म्हणजे परीक्षेचा अभ्यास नक्की कधीपर्यंत करु?

आता काहीजण म्हणतील की अभ्यासच झाला नसेल तर परीक्षा हॉलमध्ये पाय ठेवेपर्यंत किंबहुना जोपर्यंत बॅग पुढे/वर्गाबाहेर ठेवायला सांगितली जात नाही तोपर्यंत वाचन केलंच पाहिजे. अनेक जणांनी तर घरुन येतानाच आता जास्त लोड घ्यायचा नाही असं ठरवलेलं असतं. तर बरेचजण ग्रुप स्टडी म्हणून घरुन वाचून आलं तरी शाळा-कॉलेजमध्ये परीक्षेच्या अर्धा तास आधी उजळणी करतात. एकूण काय प्रत्येकाच्या मनातील परीक्षेची भीती आणि झालेला अभ्यास याच्या प्रमाणावर कोणत्या वेळी अभ्यास थांबवायचा हे ठरतं.

आता करियरनामावाल्यांच्या एक्सपर्ट लोकांचं म्हणणं विचारात घ्याल तर परीक्षेच्या आधी किमान वीस मिनिटं ते अर्धा तास सर्व अभ्यास थांबवायला हवा. परीक्षागृहात १५ मिनिटं शांत बसून राहून केलेल्या अभ्यासाची मनातल्या मनात उजळणी केली तर त्याचा अधिक फायदा परीक्षेत होऊ शकतो. जे वाचलंय ते पेपरमध्ये व्यवस्थित लिहिता येण्यासाठी ही शांतता अधिक उपयुक्त आहे. जास्त अडथळा वाटत असेल तर शांतपणे आठवलेलं उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर मागील पानावर कच्चं काम म्हणून लिहून काढावं. दहावी-बारावीचे अनेक विद्यार्थी आता प्रश्नपत्रिका सोडवत असतील, त्यांनीही एखादी प्रश्नपत्रिका सोडवताना या ट्रिकचा वापर करायला हरकत नाही.

पुन्हा भेटू, असंच परीक्षेच्या नव्या गप्पा-गोष्टी करण्यासाठी..!!