दहावी, बारावीच्या निकालाच्या तारखेबाबत बोर्डानं दिलं स्पष्टीकरण; म्हणाले..

मुंबई । महाराष्ट्र राज्य माध्यमिक (SSC) आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (HSC) इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे डोळे लागले आहेत. सर्वसाधारणपणे हे निकाल दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरूवातीला लागतात मात्र, यंदा लॉकडाऊनलमुळे दहावी-बारावीचे निकाल रखडले आहेत.गेल्या आठवडाभरापासून दहावी-बारावीच्या निकालासंदर्भात प्रसारमाध्यमांत आणि सोशल मीडियावर अनेक निकालासंदर्भात बातम्या प्रकाशित होत आहेत. त्यासंदर्भात राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

राज्यातील दहावी-बारावीच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे संकलन आणि निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. अद्याप निकालाची तारीख ठरलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी पालकांनी निकालाच्या कोणत्याही तारखांवर विश्वास ठेवू नये. राज्य मंडळाकडून निकालाची तारीख अधिकृतरित्या जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी दिली आहे.

दरम्यान, यावर्षी सुमारे १३ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची तर सुमारे १७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. गेल्यावर्षी राज्य मंडळाचा दहावीचा निकाल ८ जून तर बारावीचा निकाल २८ मे रोजी जाहीर करण्यात आला होता. मात्र, कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे यंदा निकाल जाहीर होण्यास थोडा उशीर होणार आहे. दहावी-बारावीच्या निकालाच्या तारखेबाबत प्रसारमाध्यमांत अनेक कयास लावले जात आहेत. यावर राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी निकालाची तारीख अद्याप निश्चित झाली नसल्याचे स्पष्ट केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”