[UPSC/MPSC] …त्या पूर्वीच पिक अप घ्या, हीच योग्य वेळ

करिअरमंत्रा । नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्ही सर्वजण अधिकारी बनण्याच्या ध्येयाने या क्षेत्राकडे वळला आणि आज पर्यंत टिकून आहात.  केंद्र सरकार मधील वरिष्ठ अधिकारी म्हणतात त्याप्रमाणे “आता आपणास यापुढे करोनासह जगावे लागेल.” तुमचा अभ्यास कसा ही असो, मात्र तुम्हाला एवढी तरी कल्पना असेलच की, आपल्या ध्येयाचं काय? तिथे ही वास्तविकता स्वीकारली आहे का? या प्रस्तावानेचं कारण असे की, सध्या क्षमता असणारे उमेदवार मला नक्कीच बऱ्यापैकी अभ्यासात स्लो पडल्याचे जाणवत आहे.

हे बघा, आज आपण २१ व्या शतकात जगत आहोत. करोना विषाणू आला. त्याने आपला कटू ठसा उमटवला. पण मानवी जीवनाचा इतिहास पाहता हे जगणं थांबेल अस वाटतं का? तर याचं उत्तर निसंकोचपणे नाही असेच कोणीही बोलेल. जर जगणं थांबणार नसेल तर मग या स्पर्धा परीक्षा कशा बर थांबतील? हो, थोडा फार संथपणा जरूर जाणवेल. पण सारं काही शून्य नक्कीच नाही होणार. हे फक्त मनाला पटून नाही चालणार. ते जाणून घेवून त्याप्रमाणे कृती  करणारा यातून नक्कीच तरून जाईल. हे मी ही सांगण्याची अजिबात गरज नाही. हे लिहिणं आणि समजून घेणं खूप सोपे, मात्र त्यावर काम करणे अवघड. यावर प्रत्येक जण जरूर चिंतन करेल अशी अपेक्षा.

आता मुद्द्यावर येतो. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) आपली भूमिका 5 जून ला मांडेल. परीक्षेच्या तारखा जाहीर होतील की नाही माहित नाही, पण भूमिका तर मांडली जाईल. त्यानंतर MPSC आपली भूमिका मांडण्याची जास्त शक्यता वाटते. मी माझ्या अनुभवाच्या आधारे येथे इतकच सांगू इच्छितो की, काही तरी हालचाल जरूर होईल. त्या दृष्टीने ऑगस्ट महिना क्रुसिअल ठरू शकतो. दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे २/३ महिने केला अभ्यास आणि आले नाव अंतिम यादीत. असं कधीच कधीच घडत नाही. स्पर्धा परीक्षा क्षेत्रात निरंतर तयारीला अनन्य साधारण महत्व असते.  सबबी सांगणारा साधी पूर्व परीक्षा देखील काढू शकत नाही. मग पुढचं सोडाच.

मग सबब अशी ही असो की, “सर, परीक्षांच्या तारखा समोर नसल्याने हे असं होतं” असं म्हणणारे अंतिम यादीचे दावेदार नव्हते आणि कधीच नसतील. अस माझं ठाम मत आहे. आज हे लिहिलं कारण मला ज्यांचेवर विश्वास होता ते ही आज संथ झाल्याचे दिसले. त्यावेळी खूप वाईट वाटते.


परीक्षांच्या तारखा यथावकाश जाहीर होतील. त्यावेळी हौशे, नवशे, गवशे सगळेच आपापल्या कोशातून बाहेर येतील. धावपळ करू लागतील. त्यावेळी सारेच जागे होतील. उरला प्रश्न आजपर्यंत रडत, कण्हत बसणाऱ्यांचा. त्यांना मात्र नंतर यश कितपत मिळेल हे सांगने कठीण असणार. परंतु या अवघड स्थितीमध्येही ज्यांनी जिद्द सोडली नाही, ते अभ्यास करत राहिले त्यांना यश नक्की मिळेल. आता हळू हळू जनजीवन सुरळीत होत असताना ‘करोना सह जगणे’ या विचाराची जाणीव पुढे येत असलेल्या काळात तग धरून असलेल्या  स्पर्धकांनी स्वत:ला थोडं हटकून पिक अप घेण्याची हीच योग्य वेळ आहे.

– मिथुन पवार
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, पुणे.
– 8275933320
– t.me/mithunpawar