मोठी बातमी! MPSCकडून विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची कमाल मर्यादा निश्चित; प्रवर्गहिनाय मिळणार आता ‘इतक्या’ संधी

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आता मर्यादा देण्यात आल्या आहेत. नवीन वर्षात म्हणजे 2021 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीरात निघालेल्या प्रत्येक परीक्षेसाठी हा नियम लागू असणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाप्रमाणेच आता राज्य लोकसेवा आयोगानेही विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी मर्यादा ठेवल्याने तेवढ्यात प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यासंदर्भाद आज परीपत्रक काढलं असून विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 6 वेळा ही परीक्षा देण्यात येईल. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांच्या मर्यादेपासून सूट देण्यात आली आहे. तर, इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 9 वेळा एमपीएससी परीक्षा देण्यात येईल. आयोगाने ठरवून दिलेल्या नियमापेक्षा अधिकची संधी घेतल्यास किंवा अधिकवेळा परीक्षा दिल्यास संबंधित विद्यार्थी किंवा उमेदवारास नोकरीचा लाभ मिळणार नाही.

विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षेस अर्ज केल्यानंतर किंवा पूर्व परीक्षा दिल्यानंतर ती संधी समजली जाणार आहे. त्यामुळे, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 6 अटेम्प्टमध्येच एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. दरम्यान, एमपीएससी परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी शेवटची संधी म्हणून वयाच्या मर्यादेपर्यंत परीक्षा देत होते. त्यामुळे, एकाच स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करताना परीक्षार्थींचा कस लागत. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना डेडलाईन निश्चित करता येणार आहे.