मुंबईनंतर आता महाराष्ट्रातील ‘या’ मोठ्या शहरातील शाळा बंद; अजित पवारांची माहिती

पुणे : पुण्यात कोरोनाचा प्रचंड उद्रेक होताना दिसतोय. पुण्यात दिवसभरात तब्बल 1 हजार 104 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. या संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि सरकार सतर्क झाले आहेत. त्यांनी संकटाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या उपाययोजना आणि कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. याच कठोर निर्बंधांपैकी एक म्हणजे शहरातील पहिले ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद 30 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यात उद्यापासून मास्कशिवाय कुणी फिरताना दिसलं तर त्याला थेट 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तसेच कुणी मास्क नसताना थुंकताना दिसलं तर त्या व्यक्तीकडून थेट 100 रुपयांचा दंड घेतला जाईल, असं पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषित केलं आहे.

अजित पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी पुणे शहरातील पहिले ते आठवीपर्यंतच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं.

तसेच, मुंबई आणि पुण्यावर कोरोना संकट मोठ्या प्रमाणात आलं आहे. त्यामुळे पुण्यात आता उद्यापासून मास्क नसेल तर 500 रुपये दंड आणि मास्क नसताना थुंकलात तर 1000 रुपये दंड अशी दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत असे पवार यांनी सांगितले.

पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री पवार म्हणाले की, ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोविड संसर्गाची स्थिती बिकट होत आहे. 105 देश, भारतातील 23 राज्ये आणि राज्यातील 11 ठिकाणी ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. पुणे शहरात एकाच दिवसाचा पॉझिटीव्हीटी दर 18 टक्के आला आहे. या पार्श्वभूमीवर 30 जानेवारीपर्यंत पहिली ते आठवीचे वर्ग बंद राहतील, मात्र ऑनलाईन शिक्षण सुरू राहील. 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत असल्याने नववी आणि दहावीचे वर्ग सुरू ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

नव्या प्रकारच्या कोविड विषाणूचा धोका टाळण्यासाठी लसीकरण वाढविणे नितांत गरजेचे आहे. नागरिकांना लसीकरणासाठी प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात आले आहे. तरीदेखील बऱ्याच नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली नसल्याने जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय आणि खासगी अशा सर्वच आस्थापनांमध्ये ‘दोन लसमात्रा नाही तर प्रवेश नाही’ या नियमाचे बंधन घालण्यात यावे. उपहारगृहे, मॉल्स, दुकाने, सिनेमागृहे, नाट्यगृहे तसेच इतर आस्थापनांच्या चालकांनी लशीच्या दोन मात्रांशिवाय कोणालाही प्रवेश देऊ नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच कोविडपासून बचावासाठी मास्कचा वापर आवश्यक आहे. त्यामुळे मास्क न वापरणाऱ्यांना 500 रुपये दंड करण्यात यावा तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना 1000 रुपये दंड आकारण्यात यावा असे निर्देश अजितदादांनी दिले. कोविड नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांनी थ्री प्लाय किंवा एन 95 प्रकारच्या मास्कचा वापर करावा, अन्य प्रकारचे मास्क सुरक्षित नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे असल्याने त्यांचा उपयोग टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले.

पुण्यात असे असतील निर्बंध –

  • पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्षात बंद राहतील; ऑनलाईन सुरु राहतील
  • नववी-दहावीचे वर्ग प्रत्यक्षात सुरु राहतील
  • मास्क नसेल तर 500 रुपये दंड
  • मास्क असताना थुंकला तर 1000 रुपये दंड
  • लसीचे दोन डोस घेतलेले नसतील तर कुठेही प्रवेश मिळणार नाही.
  • हॉटेल असो वा शासकीय कार्यालय असो, दोन डोसशिवाय कुठेही प्रवेश मिळणार नाही.
  • या नियमांचं तंतोतंत पालन होईलच.