NDA प्रवेश प्रक्रियेच्या स्वरूपात बदल

करिअरनामा ऑनलाईन । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (NDA) निवड होण्यासाठी विद्यार्थ्यांची उत्तम प्रकारे तयारी करून घेणाऱ्या औरंगाबाद येथील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेने  प्रवेश प्रक्रियेच्या स्वरूपात बदल केला आहे. प्रवेश परीक्षा आणि मुलाखत न घेता केवळ दहावीतील गुणांनुसार प्रवेश देण्यात येणार आहे.

सैनिकी क्षेत्रात मराठी टक्का वाढावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था सुरु करण्यात आली आहे. या संस्थेत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. ‘एनडीए’ साठी निवड होण्याकरिता या संस्थेत विद्यार्थ्यांची कसून तयारी करून घेतली जाते. त्यामुळे ‘एनडीए’ मध्ये निवड होणाऱ्यात या संस्थेतील विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असते. दरवर्षी या संस्थेत फक्त 60 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाते. शारीरिक पात्रताही तपासली जाते.

कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी संस्थेने प्रवेश प्रक्रियेत बदल केला आहे. इयत्ता 10 वीतील गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.  विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाणार नसल्याचे संचालक कर्नल (निवृत्त )अमित दळवी यांनी स्पष्ट केले आहे. या प्रवेशासाठी दहावीतील गणित , विज्ञान आणि इंग्रजी या विषयातील गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. संस्थेकडे आलेल्या अर्जानुसार गुणवत्ता यादी संस्थेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 31 ऑगस्ट पर्यंत नोंदणी करता येणार आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com