आरोग्य विभागात होणार 16 हजार जागांसाठी भरती; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मोठी घोषणा

करिअरनामा ऑनलाईन । राज्यामध्ये करोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभागात तब्बल 16 हजार पदांची भरती प्रक्रिया केली जाणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यामध्ये क आणि ड वर्गातील एकूण 12 हजार पदे, ब वर्गातील 2 हजार पदे आणि 2 हजार विशेषज्ञांचा समावेश असणार आहे. येत्या आठवड्याभरात यासंदर्भातली शासन पातळीवरची निर्णय प्रक्रिया पार पाडली जाईल आणि त्यानुसार भरती प्रक्रियेला सुरुवात केली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यामुळे कठीण काळातही तरुणांना रोजगाराची मोठी संधी मिळणार आहे.

राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाची बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत रुग्णसेवेशी संबंधित पदांची १०० टक्के भरती करण्याची गरज आहे असे मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही सांगितलं. कॅबिनेटने ठरवले आहे की आता आरोग्य विभाग, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या स्तरावर हा निर्णय येत्या 2 ते 3 दिवसांत घेतला जाईल. तसंच, तातडीने परीक्षा घ्याव्यात असं देखील ठरवण्यात आले आहे. त्यामुळे भरतीचा निर्णय आता मंत्रिमंडळ स्थरावरून घेण्यात येणार असल्याने याची प्रक्रिया जलदगतीने होण्याचे संकेत आहेत.

“12 हजार क आणि ड वर्गातील जागा, 2 हजार ब वर्गातील डॉक्टर-मेडिकल ऑफिसर आणि 2 हजार स्पेशालिस्ट यांच्या जागा भरण्याचा निर्णय आपण घेत आहोत. त्याची शासन स्तरावरील कारवाई आठवड्याभरात पूर्ण होईल. त्यानंतर क आणि ड वर्गासाठी एजन्सीच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाईल. आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या माध्यमातून ब वर्गाच्या मुलाखती घेतल्या जातील. तर अ वर्गासाठीचे सिलेक्शन एमपीएससीकडे पाठवले जातील”, असं टोपे यावेळी म्हणाले.