१० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; राज्य सरकाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

करिअरनामा । दिवाळीनंतर महाराष्ट्रातील शाळा प्रत्यक्ष उघडण्याचे संकेत राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार दहावी आणि बारावीचे‌ वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा‌ विचार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली. त्यामुळे दिवाळी संपल्यानंतर येणाऱ्या सोमवारी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेची पायरी चढता येईल. (Tenth and Twelfth School Classes likely to reopen after 23rd November hints education minister Varsha Gaikwad)

१० आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा मे पूर्वी घेणं शक्य नाही, ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा-कॉलेज दिवाळीनंतर सुरु करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, त्यामुळे लवकरच यावर निर्णय होईल. दिवाळीनंतर शाळा-कॉलेज सुरु झाल्या तर मुलांच्या शैक्षणिक वर्षावर परिणाम होणार नाही, विद्यार्थ्यांचे वर्ग सोशल डिस्टेंसिंगचं पालन करून, योग्य ती काळजी घेऊन सुरु करण्याची तयारी शालेय शिक्षण विभागाने केली आहे. जर दिवाळीनंतर शाळा-कॉलेज सुरु झालं तरच मे महिन्यात १० आणि १२ वीच्या परीक्षा घेता येऊ शकतात असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.