राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी “ज्ञानगंगा”

करिअरनामा ऑनलाईन ।शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानगंगा हा शैक्षणिक कार्यक्रम येत्या सोमवारी २६ ऑक्टोबरपासून सकाळी साडेसात ते साडेबारा या वेळेत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर काही दिवसांत इयत्ता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी अशाच प्रकारचा कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. मात्र, काही अडचणींमुळे दहावी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम उशिराने सुरू होणार आहे.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे शालेय शिक्षण विभागाने यंदाच्या शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरू केले आहे. मात्र, राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याकडे ऑनलाइन शिक्षणासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा व स्मार्टफोनसारखी साधने नाहीत. कोणत्याच सुविधा नसल्याने, ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असल्याचे चित्र आहे. या सर्वांवर उपाय म्हणून शालेय शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वी जिओ वाहिनीवर ज्ञानगंगा उपक्रम सुरू केला. याचाच पुढचा टप्पा म्हणून सह्याद्री वाहिनीवर ज्ञानगंगा शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यात येत आहे.

शैक्षणिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. काही दिवसांपूर्वी शैक्षणिक कार्यक्रमासाठी दूरदर्शनवर वेळ मिळावी यासाठी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून वेळेची मागणी केली होती. त्यानुसार आता सह्याद्री वाहिनीवर शैक्षणिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमाबाबतची अधिक माहिती वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर दिली आहे.

शैक्षणिक कार्यक्रमाचे वेळापत्रक – 

बारावी वाणिज्य – सकाळी साडेसात ते साडेआठ

बारावी विज्ञान – नऊ ते दहा

बारावी व्यावसायिक शिक्षण – दहा ते साडेदहा

बारावी कला – साडे दहा ते अकरा

दहावी इंग्रजी माध्यम – साडेअकरा ते दुपारी साडेबारा

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com